विराट कोहलीने गोलंदाजांवर फोडले पराभवाचे खापर

चेन्नईने आयपीएलच्या ११व्या हंगामातील २४व्या सामन्यात बंगळूरुच्या संघावर ५ विकेट राखून विजय मिळवला. 

Updated: Apr 26, 2018, 02:33 PM IST
विराट कोहलीने गोलंदाजांवर फोडले पराभवाचे खापर title=

बंगळूरु : चेन्नईने आयपीएलच्या ११व्या हंगामातील २४व्या सामन्यात बंगळूरुच्या संघावर ५ विकेट राखून विजय मिळवला. बंगळूरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. मात्र धोनीच्या संघाने दोन चेंडू राखताना ५ विकेट गमावत २०७ धावा केल्या. अंबाती रायडू(८२)  आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला. हा सामना फारच उत्कंठावर्धक ठरला. 

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. कर्णधार धोनीने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या डावात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून दिला. यावेळी वर्ल्डकपच्या अखेरच्या विजयी षटकाराची आठवण आली. सामना संपल्यानंतर विराट कोहली निराश दिसत होता. कोहलीने या पराभवासाठी गोलंदाजांना कारणीभूत ठरवलंय.

सामन्यानंतर झालेल्या सोहळ्यात तो म्हणाला, आम्हाला बऱ्याच गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल. ज्याप्रकारे आमच्या गोलंदाजांनी कामगिरी केली ती स्वीकारार्ह नाहीये. चेन्नईच्या संघाने ७२ धावांवर चार विकेट गमावले होते. मात्र पाचवा विकेट घेण्यासाठी इतक्या धावा देणे चुकीचे आहे. स्पर्धेत पुढे जायचे असेल तर सगळ्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जर  आम्ही २००चे लक्ष्य वाचवू शकत नाही तर ही समस्या आहे आणि यावर लक्ष देणे गरजेचे असते.