IND vs WI: आजच्या सामन्यात विराटची जागा कोण घेणार?

आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

Updated: Feb 20, 2022, 11:35 AM IST
IND vs WI: आजच्या सामन्यात विराटची जागा कोण घेणार? title=

मुंबई : आज वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे. दरम्यान ही सिरीज यापूर्वीच टीम इंडियाने आपल्या नावावर खेळली आहे. सिरीज जिंकल्यामुळे विराट कोहली आणि ऋषभ पंतला या सामन्यातून ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार?

दरम्यान विराट कोहलीचा टीममध्ये समावेश नसल्याने त्याजागी श्रेयस अय्यरची नियुक्ती केली जाऊ शकते. टीममधील अनेक फलंदाज आणि ऑलराऊंडर्समुळे श्रेयसला यापूर्वी टीममध्ये संधी मिळाली नाही. मात्र आता विराटच्या अनुपस्थितीत श्रेयसला संधी मिळू शकते. 

श्रेयस अय्यरला विराटच्या जागी तीन किंवा चार नंबरवर खेळण्यास उतरण्याची संधी मिळू शकते. जर श्रेयसला चार नंबरवर खेळवण्यास उतरवलं तर सुर्यकुमार यादव तिसऱ्या नंबरवर खेळण्यास उतरू शकतो. अय्यर एक उत्तम फलंदाज असून त्याने वनडेमध्येही चांगली कामगिरी केली आहे. 

तिसऱ्या टी-20 सामन्यातून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच सिरीज जिंकल्यामुळे रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.

हा खेळाडू करणार ओपनिंग

वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या गेल्या 2 टी-20 सामन्यात रोहित शर्माने इशान किशनला ओपनिंगला उतरवलं होतं. मात्र इशान ओपनिंगला उतरून साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने 2 सामन्यात केवळ 37 रन्स केलेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ओपनिंग जोडी बदलू शकते. यामध्ये इशानला बसवून ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे.