पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असं मी बोललोच नव्हतो- अनिल देशमुख

पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. 

Updated: Sep 20, 2020, 01:02 PM IST
पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असं मी बोललोच नव्हतो- अनिल देशमुख title=

पुणे: राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे काहीही मी बोललेलो नाही. ते वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आले, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला गेला, असे अनिल देशमुख यांनी म्हटल्याचं वृत्त आज प्रसिद्ध झाले होते.

पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले,  असे देशमुख यांनी सांगितल्याचे संबंधित वृत्तात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मी असं काही बोललेलो नाही. तुम्ही माझी ती मुलाखत पाहू शकता, असे देशमुख यांनी सांगितले. 

'पोलीस भरती प्रक्रियेसाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल'
पोलीस भरती पक्रिया ही मोठी असेल. १२५०० जागांसाठी जवळपास पाच ते सहा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच पोलीस खात्यातील प्रस्तावित भरतीबाबत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने १३.५ टक्के जागा राखून ठेवून इतर भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.