एअर इंडियाच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला; १३६ प्रवाशी बचावले

एअर इंडियाचे विमान उतरले चुकीच्या धावपट्टीवर

Updated: Sep 7, 2018, 09:25 PM IST
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला; १३६ प्रवाशी बचावले title=

नवी दिल्ली: मालदीवमध्ये शुक्रवारी एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावले. वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान चुकीच्या धावपट्टीवर उतरले. या धावपट्टीचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. तिरुवनंतपुरमवरून माले असा प्रवास करणाऱ्या या विमानामध्ये १३६ प्रवासी होते. बांधकाम पूर्ण न झालेल्या धावपट्टीवर विमान उतरवल्यामुळे विमानाचे दोन टायर्स फुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. 

एअर इंडियाच्या माहितीनुसार, AI263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे १३० प्रवाशी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ताज्या माहितीनुसार वैमानिकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.