भारताची मदत रामायणातील संजीवनीप्रमाणेच, ब्राझीलने मानले भारताचे आभार

ब्राझीलकडून भारताचं कौतुक

Updated: Apr 8, 2020, 12:45 PM IST
भारताची मदत रामायणातील संजीवनीप्रमाणेच, ब्राझीलने मानले भारताचे आभार title=

मुंबई : कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर ओढावलं असताना भारताकडून वेगवेगळ्या देशांना मदत पोहोचवली जात आहे. अमेरिकेनंतर आता ब्राझीलने ही भारताने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून भारताने केलेल्या मदतीची तुलना हनुमानाने आणलेल्या संजीवनी सोबत केली आहे. त्यांनी भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्रीचा देखील उल्लेख केला.

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, 'संकटात भारताने ब्राझीलची मदत केली. ही मदत रामायणातील हनुमानाने रामाचे भाऊ लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी आणलेल्या संजीवनी सारखीच आहे.' आज भारतात हनुमान जंयती साजरी केली जाते.

ब्राझीलने भारताचं केलेलं कौतुक हे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसाठीच आहे. भारताने मंगळवारी म्हटलं की, 'ज्या देशांना याची खूप गरज आहे. अशा देशांना भारत मदत करेल.'

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, 'त्यांच्या देशात २ लॅब कोरोनावर वॅक्सीन बनवत आहे. पण याची निर्यात पूर्णपणे भारतावर अवलंबुन आहे. त्यामुळे भारताकडून मदतीची अपेक्षा आहे.'

याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य देखील आलं होतं. ज्यामध्ये त्यांनी भारताने केलेल्या मदतीसाठी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं.