Aishwarya Rai च्या मागे ईडीची पीडा, जया बच्चनकडून कोणाला शाप?

दुपारी 2 च्या सुमारास अभिनेत्री ईडी कार्यालयात पोहोचली होती.

Updated: Dec 20, 2021, 09:29 PM IST
 Aishwarya Rai च्या मागे ईडीची पीडा, जया बच्चनकडून कोणाला शाप? title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आज ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. दुपारी 2 च्या सुमारास अभिनेत्री ईडी कार्यालयात पोहोचली होती.  या प्रकरणात जवळपास सहा तास चौकशी झाल्यानंतर ऐश्वर्या ईडी कार्यालतून बाहेर पडली आहे. 

जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आजचं ऐश्वर्याला ईडीने समन्स पाठवलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली होती.

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपासात गुंतले आहेत. पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. 

आज एकीकडे ऐश्वर्या राय हिची चौकशी सुरू होती, तर दुसरीकडे जया बच्चन केंद्र सरकारवर निशाणा साधताना दिसल्या. राज्यसभेत खासदार जया बच्चन यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. "तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील, हा माझा शाप आहे अशा शब्दात जया बच्चन यांनी तीव्र संपात व्यक्त केला.

पुढे त्या म्हणाल्या, " आपल्याला बोलू दिलं जात नाही. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे असं म्हणत जया बच्चन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या लोकांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

बच्चन कुटुंबाचं नाव का प्रकरणात? 

2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर असलेले कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाचं नाव देखील आहे.

एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीचे संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर तिला शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं.

ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.