कॅन्सरवर मात केल्यानंतर संजय दत्तनं लिहिली भावनिक पोस्ट

या आजाराशी लढण्यासाठी... 

Updated: Oct 22, 2020, 09:13 AM IST
कॅन्सरवर मात केल्यानंतर संजय दत्तनं लिहिली भावनिक पोस्ट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही महिन्यांपूर्वीच आपल्याला फुफ्फुसांच्या कॅन्सरनं Cancer ग्रासल्याची माहिती अभिनेता संजय दत्त Sanjay Dutt  यानं दिली आणि चाहत्यांना धक्काच बसला. त्याच्याप्रती कोणी चिंता व्यक्त केली तर, काहींनी या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. कोणी त्याला सकारात्मक उर्जाही दिली. याच बळावर आणि अर्थाच डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या बळावर अखेर संजूबाबानं कॅन्सरवर मात केली आहे. 

बुधवारी संजय दत्त मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातून घरी आला आणि त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कॅन्सरवर मात केल्याची आनंदाची बातमी सर्वांनाच सांगितली. माध्यांच्या प्रतिनिधींनी या वेळी काही क्षण कॅमेऱ्यातही कैद केले. यावेळी संजय दत्तच्या बहीणीलाही त्याच्यासोबत पाहिलं गेलं. 

फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि सफेद पायजमा अशा लूकमध्ये संजूबाबानं सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यानं नेहमीप्रमाणेच हात उंचावत आणि स्मितहास्य देत आपल्याच अंदाजात सर्वांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्याच दिवशी संजूबाबाचं घरी परतणं आणि तेसुद्धा इतक्या मोठ्या रोगावर मात करुन हा एक सुरेख योगायोग. याचाच उल्लेख त्यानं सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टमध्येही केला. शिवाय व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यानं मुलांचा वाढदिवसही सेलिब्रेट केला. संजय दत्तची पत्नी आणि मुलं सध्या दुबईमध्ये आहेत. असं असलं तरीही या क्षणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, या आनंदाच्या वातावरणात अतिशय भावनिक पोस्ट लिहित त्या माध्यमातून संजय दत्त म्हणाला, 'कुटुंब आणि माझ्या स्वत:साठी मागील काही आठवडे फार कठीण होते. पण, ते म्हणतात ना खंबीर योद्ध्यांनाच देव कठीण युद्धांसाठी नेमतो. .... आणि आज माझ्या, मुलांच्या वाढदिवसाच्याच दिवशी कॅन्सरवर मात करत मी त्यांना आरोग्य आणि सुखी जीवनाची कास भेट देत आहे'.

 

चाहते आणि कुटुंबीच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सारं शक्य झालं नसतं असं त्यानं इथे न विसरता नमूद केलं. तर, आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. संजय दत्त यानं ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. एका अर्थी सर्वांनीच या अभिनेत्याचं जीवनाच्या या नव्या आणि तितक्याच सकारात्मक पर्वात उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.