Leaders : बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसताना घराबाहेर पडला आणि झाला कॉमेडीचा बादशाह

सगळ्यांना हसवणाऱ्या या अभिनेत्यावर एकवेळ अशी आली होती की, जेव्हा त्याच्याकडे बहिणीचं लग्न करण्यासाठीही पैसे नव्हते.

Updated: Nov 8, 2021, 07:37 PM IST
Leaders : बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसताना घराबाहेर पडला आणि झाला कॉमेडीचा बादशाह title=

मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने आज प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचा शो 'द कपिल शर्मा शो' देखील टीव्ही जगतातील सर्वात आवडता आणि पाहिला जाणारा प्रसिद्ध शो आहे. जिथे प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स येतात. पण तुम्हाला माहित आहे का की, सगळ्यांना हसवणाऱ्या कपिल शर्माच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, जेव्हा त्याच्याकडे बहिणीचं लग्न करण्यासाठीही पैसे नव्हते. चला तुम्हाला त्याच्या संघर्षाची कहाणी सांगूया....

कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसर, पंजाब ईथे झाला. त्याचे वडील जितेंद्र कुमार हेड कॉन्स्टेबल होते. आणि त्याची आई जानकी राणी गृहिणी आहे. कपिलला एक मोठा भाऊ आणि बहीण देखील आहे. कपिल लहानपणापासूनच खूप खोडकर आणि नखरेबाज होता. टीव्ही पाहिल्यानंतर त्याला अभिनेत्यांची नक्कल करायला आवडायची. लहानपणापासूनच तो आपल्या कृतीने लोकांना हसवायचा. तेव्हा कोणालाच याची कल्पनादेखील नव्हती की, एक दिवस तो आपल्या कॉमेडीने संपूर्ण जगावर राज्य करेल.

कपिलच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट तेव्हा टप्पा होता जेव्हा त्याला कळलं की, त्याच्या वडिलांना कॅन्सर आहे. या आजाराची माहिती मिळाल्यानंतर कपिलने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात नेलं. पण दुर्दैवाने 2004 मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा कपिल केवळ 23 वर्षांचा होता.

वडिलांच्या निधनानंतर कपिल आपलं करिअर घडवण्यासाठी मुंबईत आला. आणि थिएटरमध्ये रुजू झाला. जिथे त्याला अभिनयातून काही पैसे मिळू लागले. त्याचवेळी एके दिवशी पंजाबचा प्रसिद्ध कॉमेडियन गुरप्रीत सिंगने कपिलला पाहिलं आणि त्याच्या कामावर खूप खूश झाला.

कपिलच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्याने टीव्ही शो "द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" मध्ये भाग घेतला. तिथूनच कपिलने लोकांची मनं जिकण्यास सुरुवात केली आणि तो शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. आणि बक्षीसात मिळालेले 10 लाख रुपये घेऊन त्यानं त्याच्या बहिणीचं लग्न केलं. यानंतर कपिलने मागे वळून कधी पाहिलंच नाही, पण हळूहळू कपिल यशाच्या पायऱ्या चढत गेला आणि त्याच्या कॉमेडीच्या जोरावर त्यानं 'कॉमेडी सर्कस' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. तो त्याच्या दोन हंगामांचा विजेता देखील ठरला.

कपिलने टीव्हीवर अनेक शो होस्ट केले आणि तो अनेक रिएलिटी शोचा भागही बनला. आणि दोन बॉलीवूड चित्रपटही त्याने केले. पण कपिलला त्यात काही खास दाखवता आलं नाही. मात्र त्याच्या 'द कपिल शर्मा' या शोने टीव्हीवर राज्य करायला सुरुवात केली . मात्र, प्रसिद्धी मिळवल्यानंतरही एक काळ असा आला की, यशाची नशा कपिलच्या डोक्यात गेली. त्यावेळी कपिलच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण सगळ्यांना मागे टाकत कपिल योद्धा म्हणून पुन्हा एकदा परतला. आणि या शोमध्ये त्याने जबरदस्त कमबॅक केलं. कपिलने गिन्नी चतरथशी लग्न केलं आणि आज तो दोन मुलांचा वडिल आहे.