सियावर रामचंद्र की..! जागतिक स्तरावर 'रामायण'ला सर्वाधिक प्रेक्षक पसंती

'रामायण' जगातील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम ठरला आहे.

Updated: May 1, 2020, 12:21 PM IST
सियावर रामचंद्र की..! जागतिक स्तरावर 'रामायण'ला सर्वाधिक प्रेक्षक पसंती title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : रामानंद सागर दिग्ददर्शित सुप्रसिद्ध मालिका 'रामायण' जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे. या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 'रामायण' मालिका दुसऱ्यांदा पुन्हा सुरु करण्यात आल्यानंतर, देशातच नाही तर जगभरातील सर्व रेकॉर्ड मोडित काढत 'रामायण' मालिकेने 16 एप्रिल रोजी 7.7 कोटी प्रेक्षकांसह जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सर्वच लोक आपापल्या घरांत आहेत. जवळपास 17 मार्चपासून सर्व मालिका, चित्रपटांचं शूटिंग बंद आहे. त्यामुळे टीव्हीवर कोणत्याही मालिकेचे नवे भाग प्रसारित होत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांकडून टीव्हीवर 'रामायण' पुन्हा प्रसारित करण्याची मागणी करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात 'रामायण' मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 28 मार्चपासून लोकाग्रहास्तव 'रामायण' प्रसारित होण्यास सुरुवात झाली. 

रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक मालिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. दररोज सोशल मीडियावर  'रामायण'च्या एपिसोडची, दृश्यांची चर्चा होत आहे. रामायण पुन्हा प्रसारित झाल्यानंतर मालिकेतील प्रमुख कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

रामानंद सागर यांनी वाल्मिकींच्या रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित या मालिकेचे एकूण 78 भाग केले होते.

देशात प्रथमच ही मालिका 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 पर्यंत प्रसारित झाली. दर रविवारी सकाळी 9.30 वाजता टीव्हीवर हा कार्यक्रम प्रसारित होत होता.

1987 ते 1988 पर्यंत 'रामायण' जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली. जून 2003 पर्यंत ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x