दिलासादायक! मुंबईत पुन्हा कोरोनाचा शून्य बळी

शनिवारच्या दिवशी मुंबईत एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं समोरं आलं आहे. 

Updated: Dec 12, 2021, 10:07 AM IST
दिलासादायक! मुंबईत पुन्हा कोरोनाचा शून्य बळी title=

मुंबई : जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली असता मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवारच्या दिवशी मुंबईत एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं समोरं आलं. मुंबईकरांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. 

शनिवारी मुंबईत कोरोनानं एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्यांदा मुंबईत अशी नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजना आणि मुंबईकरांची साथ यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणं शक्य झालंय. तर शनिवारी मुंबईत 256 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पूर्ण नियंत्रणात असली तरी ओमायक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलंय. दाटीवाटी वस्तीच्या धारावीत कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाने प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. संपूर्ण राज्यात शनिवारच्या दिवसात 807 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 869 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झालाय आहे.