'ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात काँग्रेसला घेरलं तरीही राफेल घोटाळ्याकडे दुर्लक्ष होणार नाही'

 '2019 निवडणूकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मिशेलला भारतात आणले गेले.'

Updated: Jan 2, 2019, 08:54 AM IST
'ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात काँग्रेसला घेरलं तरीही राफेल घोटाळ्याकडे दुर्लक्ष होणार नाही' title=

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांना घेरण्याची पूर्ण तयारी झाली आहे. 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घडामोडी जुळवून आणल्या जात आहेत. असे सर्व सुरू असले तरीही राफेल घोटाळ्याकडे लोकांचे दुर्लक्ष होणार नाही असा टोला भाजप सरकारला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावण्यात आला आहे.  तीन हजार सहाशे कोटींचा ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहार सध्या देशभरात गाजतोय. याप्रकरणात ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने दिल्लीच्या कोर्टात दिली. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये बाचाबाची सुरू आहे.

यंत्रणेचा वापर 

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहा यांच्यासह सर्वच आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांचे नाव घेण्यासाठीसीबीआय आणि इतर तपास अधिकाऱ्यांवर दबाब टाकल्याचे समोर आले. आता ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारातही सोनियांचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव आणला जात असल्याचे कॉंग्रेसवाले म्हणत आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणाही दोनचार लोकांच्या टाचेखाली असून राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी यंत्रणेचा वापर करुन घेतला जात असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.

'दोघांनीही उत्तर द्या'

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात सोनिया गांधींचे नाव आले आहे. कॉंग्रेसला याचे उत्तर द्यावेच लागेल. तर दुसरीकडे राफेल प्रकरणातही हेच चित्र आहे. राफेल घोटाळ्यात पंतप्रधान मोदी आणि अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्,चे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले आहे. त्यामुळे भाजपलाही याचे उत्तर द्यावे लागणार असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. विमानांच्या किंमती वाढवून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे ऑगस्टा वेस्टलॅण्ड आणि राफेल अशी लढाई सुरू आहे.

मिशेल महाराजांचा नामजप 

मिशेलला भारतात आणूनही पाच भाजपप्रणित राज्यांमध्ये भाजपचा पराभव झालाच आहे. पण 2019 निवडणूकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मिशेलला भारतात आणल्याचे म्हटले गेले आहे. आगामी निवडणूकीत महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पडतील व मिशेल महाराजांचा नामजप होईल अशी टीकाही मोदी सरकारवर करण्यात आली आहे.