एनडीएतील पडझड थांबवण्यासाठी अमित शाहंकडून मनधरणीचे प्रयत्न

 एनडीएमधून एक एक मित्रपक्ष दूर जात असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना धक्का

Updated: Dec 21, 2018, 08:57 PM IST
एनडीएतील पडझड थांबवण्यासाठी अमित शाहंकडून मनधरणीचे प्रयत्न  title=

नवी दिल्ली : 'कॉंग्रेस हटाव, देश बचाव'चा नारा देत मोदी सरकार सत्तेवर आले. हळूहळू सर्वच राज्य काबीज करण्याची घोडदौड सुरू झाली. पण नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीत तीन राज्यांमध्ये भाजपाला कॉंग्रेसने धूळ चारली. दरम्यान उपेंद्र कुशवाह यांनीही एनडीएला सोडचीठ्ठी देत युपीएशी हातमिळवणी केली. एनडीएमधून एक एक मित्रपक्ष दूर जात असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना धक्का बसला आहे.

विरोधकांची एकजूट 

 दुसरीकडे युपीए मजबूत होताना दिसत आहे. राहुल गांधी आणि त्यांचे महागठबंधन राज्यस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात एकजुटीने दिसले. युपीएने आपले शक्तीप्रदर्शन करत एनडीए सरकारला आव्हान केले. विरोधी पक्षांची एकजूट  यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतले गणित कसे जुळवायचे याची चिंता शहांना पडली आहे.

खास योजना 

एनडीतली ही पडझड थांबविण्यासाठी अमित शाह यांनी खास योजना तयार केली असून नाराज मित्रपक्षांच्या मनधरणीसाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी त्यांनी लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि खासदार चिराग पासवान यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेत त्यांची समजूनत काढली.

बिहारमधल्या जागावाटपाबाबत त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकाही दूर करण्याचा प्रयत्न केला. जागा वाटपात अन्याय होणार नाही असे आश्वासनही त्यांनी पासवान यांना दिले. त्यामुळे मनधरणीच्या या प्रयत्नात अमित शाह किती यशस्वी ठरले आहेत ते येणारा दिवसात स्पष्ट होणार आहे.