'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन

विनायक दामोदर सावरकरांच्या नावावरुन नव्या वादाला सुरुवात   

Updated: May 29, 2019, 09:34 AM IST
'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन  title=

नवी दिल्ली : राजस्थानचे माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी मंगळवारी राजस्थान काँग्रेसवर टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख 'son of Portugal' असा करण्यात आल्यामुळे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. राजस्थानमधील इयत्ता दहावीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्यामुळे आता त्याविषयीच्या वादाने डोकं वर काढलं आहे. 

सत्तेत परतल्यानंतर राजस्थान काँग्रेस सरकारने एक समिती स्थापन करत त्या समितीच्या निरीक्षणाच्या आधारावर सावरकरांची भाजपाकडून करून देण्यात आलेल्या अल्प परिचयात काही बदल केले. ज्यानंतर सध्याच्या घडीला, पुस्तकात उल्लेख केल्यानुसार खुद्द सावरकरांनीच १९१०-११ मध्ये इंग्रज सरकारची माफी मागत स्वत:चा उल्लेख 'son of Portugal', 'पोर्तुगालचे सुपुत्र' असा केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 

सावरकरांविषयीचा हा उल्लेख पाहता देवनानी यांनी ट्विट करत राजस्थान सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी, ज्यांनी सावरकरांच्या देशभक्तीची दाद दिली होती, असं मत मांडलं. त्यावेळच्या सरकारकडून सावरकरांच्या योगदानाकरता त्यांच्या सन्मानार्थ १९० मध्ये स्टॅम्पचं अनावरण केल्याचंही ते म्हणाले. 

खुद्द इंदिरा गांधी यांनी खासगी निधीतून सावरकर विश्वस्त मंडळाला ११ हजार रुपये देत चित्रपट विभागाला त्यांच्या आयुष्यावरी माहितीपटाची निर्मिती करण्याची विचारणा केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीचा "son of Portugal" म्हणून उल्लेख करणं चुकीचं ठरेल, असं ठाम मत त्यांनी मांडलं. 

राजस्थान सरकारमध्ये सध्याच्या घडीला शिक्षणमंत्री पदावर असणाऱ्या गोविंद सिंह डोटासारा यांनी देवनानी यांच्या पुस्तकात बदल करण्याच्या मागणीवर त्यांना उत्तर दिलं आहे.  तज्ज्ञांचे सल्ले आणि त्यांच्या निरीक्षणानंतरच पुस्तकात हे बदल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

'सावरकर द्वीराष्ट्रवादाचे प्रणेते'

एकिकडे पुस्तकातील उल्लेख बदलण्याच्या अनुशंगाने सुरु असणाऱ्या वादाची चर्चा असतानाच दुसरीकडे लक्ष वेधत आहे ते म्हणजे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सावरकर हे द्विराष्ट्रवादाचे प्रणेते होते, असं म्हणत तेच विचार मोहम्मद अली जिन्नाह यांनीही पुढे  नेत अंमलात आणल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.