तीन तृणमूल नेत्यांची हत्या, पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव

Canning Murder : गजबलेल्या परिसरात तृणमूल नेते  (TMC Leader) आणि त्यांच्या साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.  

Updated: Jul 7, 2022, 01:03 PM IST
तीन तृणमूल नेत्यांची हत्या, पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव title=
संग्रहित छाया

पश्चिम बंगाल : Canning Murder : गजबलेल्या परिसरात तृणमूल नेते  (TMC Leader) आणि त्यांच्या साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. ही हत्या कॅनिंगमध्ये घडली. हल्लेखोरांनी एकूण 3 जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये एक ग्रामपंचायत समिती सदस्य आहे. 

स्वपन माळी असे मृत ग्रामपंचायत सदस्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कॅनिंग-गोपाळपूर पंचायत सदस्य स्वपन माळी आणि इतर दोघे दुचाकीवरुन जात होते. तेवढ्यात चार-पाच मारेकर्‍यांनी मागून हल्ला केला. त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. 

हल्ल्यात जखमी झाल्यानंर हल्लेखोरांनी त्यांचा मृत्यू व्हावा यासाठी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पळून जात असताना हल्लेखोरांनी बॉम्बही फेकले. घटनेची माहिती मिळताच कॅनिंग पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. कॅनिंगमधील घटनमागे वैयक्तिक वैमनस्य असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कदाचित वैयक्तिक कारणामुळेच ही निर्घृण हत्या झाली असावी. तिघांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाबानी भवनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कॅनिंग पोलीस ठाण्याच्या दक्षिणेकडील गोपाळपूर ग्रामपंचायती शेजारी गुरुवारी सकाळी रस्त्याच्या कडेला तीन मृतदेह आढळून आले. मृतदेहांमध्ये ग्रामपंचायत सदस्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. ही राजकीय वादातून हत्या आहे की कौटुंबिक कलहातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस आणि स्थानिकांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी तीन मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले आढळून आलेत. गावात ही बातमी पसरली आणि संपूर्ण गाव त्या घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ओळखण्यासारखी स्थिती नव्हती. मृतदेहांची  शस्त्राने चाळण करण्यात आली होती. दरम्यान, एकाची ओळख पटली असून तो ग्रामपंचायत सदस्य आहे.