'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद

Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 3, 2024, 05:00 PM IST
'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद title=

Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) शनिवारी न्यायसंकल्प रॅलीचं (Nyay Sankalp Rally) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. ज्याप्रमाणे कुत्रा खरेदी करताना तो नीट भुंकतोय की नाही हे तपासलं जातं, त्याचप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवलं पाहिजे असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. या रॅलीत काँग्रेसच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. 

"बूथ एंजटची नियुक्ती करताना विचारपूर्वक करा. अनेकजण अचानक गायब होतात. आमच्याकडे म्हणतात की, जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा चांगला कुत्रा किंवा प्राणी खऱेदी करायचा असेल तर बाजारात जाऊन योग्य चाचपणी करतात. जर इमानदार प्राणी हवा असेल तर त्याचा कान पकडून वर उचलतात. कान उचलल्यानंतर जर तो भुंकला तर ठीक, पण जर कुईकुई करत असेल तर कोणी घेत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही निवड करताना जो भुंकतोय, लढतोय, सोबत राहतोय त्याला घ्या. त्याला बूथचा एजंट बनवा," असं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले आहेत. 

मल्लिकार्जून खर्गेंनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "मोदींनी फक्त सबका साथ, सबका विकास घोषणा दिली आहे. पण त्यांनी फक्त सत्यानाश केला आहे". 

पुढे ते म्हणाले की, "राहुल गांधी देशाचं संविधान वाचवण्यासाठी भाजपा सरकारमध्ये होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढत आहेत. जर तुम्ही या लढाईत हारलात, तर तुम्ही मोदींचे गुलाम व्हाल. मोदी या देशातील जनतेला गुलामीत ढकलतील. आज देशात 30 लाख रोजगार आहेत, पण त्या रिक्त जागा भरल्या जात नाही आहेत. जाणुनबुजून तिथे नोकरभरती केली जात नाही आहे".

'पलटू राम झालेत पलटू कुमार'

मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. नितीश कुमार पलटू राम, पलटू कुमार झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदींनाही हीच सवय आहे. ते बोलत नाहीत, पण आतून सर्वांचा घात करत असतात. तोंडात राम आणि बगलेत सुरी घेऊन ते चालतात असं ते म्हणाले. 

भाजपाकडून टीका

भाजपाचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावर टीका केली आहे. "ज्या पक्षाचा अध्यक्ष आपल्या संघटनेच्या सर्वात मजबूत आणि महत्त्वपूर्ण दुवा 'बूथ एजंट'ला 'कुत्रा' बनवून त्याची चाचणी करु इच्छितो त्या पक्षाची घसरण नक्की आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.