Coronavirus : लॉकडाऊनमुळे ५०० किमीचा प्रवास केलेल्या तरूणाचा मृत्यू

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरीबांना 

Updated: Apr 3, 2020, 02:38 PM IST
Coronavirus : लॉकडाऊनमुळे ५०० किमीचा प्रवास केलेल्या तरूणाचा मृत्यू  title=

मुंबई : कोरोना महामारीचं संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा अभाव निर्माण झाला. यामुळे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांवर पलायन करण्याची वेळ आली. हातावर पोट असणारे हे मजूर अक्षरशः हजारो किमीचा प्रवास करून आपल्या गावी जावू लागले. तामिळनाडूत राहणाऱ्या २३ वर्षीय तरूण मजूराचा ५०० किमीचा प्रवास केल्यामुळे गुरूवारी मृत्यू झाला आहे.

२३ वर्षीय तरूण तीन दिवसांपूर्वी २६ लोकांसोबत महाराष्ट्रातील नागपूरमधून तामिळनाडूच्या नामक्कलपर्यंत पोहोचण्यासाठी पायी निघाला होता. लोगेश बालासुब्रमनी जवळपास ५०० किमीचा प्रवास करून बुधवारी सिकंदराबाद येथे पोहोचला. तिथे एका आश्रमात आराम करताना त्याचा जीव गेला. लोगेश शेल्टर रूममध्ये आराम करताना एका जागी बसला होता तिथे त्याने अचानक आपला जीव सोडला.

स्थानिक नेता अकुला बालकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी सरकारी डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर त्यांनी त्याला मृत घोषित केलं. लोगेशचा मृतदेह गांधी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी लोगेशसोबत २५ जणांनी आपली पदयात्रा सुरू केली होती. तीन,चार दिवसांपासून सतत पायी प्रवास केल्यामुळे लोगेशला हा त्रास झाला. रस्त्यात देखील कोणतं साधन उपलब्ध होऊ शकलं नाही. काहींनी वाटसरू समजून खायला दिलं. काही ट्रक चालकांनी लिफ्ट दिली. पण पोलिसांनी मात्र त्यांना खूप वाईट पद्धतीने या लोकांना मारलं. 

आपल्याला माहितच आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्याची वेळ आली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गरीबांना मोठा फटका पडला. पंतप्रधान मोदींनी देखील आज ही गोष्ट आपल्या भाषणात कबुल केली. हातावर पोट असणाऱ्या लोकांच खूप मोठं नुकसान झालं आहे.