शेतकरी आंदोलन उधळण्याचा डाव, चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट

दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनात घातपात घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे.  

Updated: Jan 23, 2021, 01:11 PM IST
शेतकरी आंदोलन उधळण्याचा डाव, चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट  title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : कृषी कायदे (Agricultural laws) रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनात घातपात घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे. दिल्लीत चार शेतकरी (Farmer) नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट उधळला गेला आहे. आंदोलनस्थळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची (tractor march) तयारी सुरू असताना खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.

देशीत शेतीविषयक तीन नवे कायदे करण्यात आले आहे. या कृषी कायद्यांवरून शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील  केवळ चर्चा झडत आहे. चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी फुटलेली नाही. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही रॅली काढण्यास रोक लागण्यासाठी केंद्र सरकार न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने केंद्र सरकारलाच फटकारले. आम्ही स्थगिती देऊ शकत नाही. पोलिसांचे काम आहे. ते त्यांनी करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

न्यायालयाने रॅलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत.  ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा  प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे. शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभे केले. त्यानंतर या व्यक्तीने चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे सांगितले.  ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता, अशी कबूली त्याने दिली आहे.

शेतकरी आंदोलन उधळवून लावण्यासाठी प्रयत्न सुरु होते, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, देशातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभेचा महाराष्ट्र राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येत आहे.