कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कातून एक छान बातमी समोर येत आहे. गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 10, 2024, 07:08 PM IST
कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच  title=
Female cheetah Gamini has given birth to 5 cubs in kuno national park

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण अफ्रिकेतून भारतात आणलेल्या गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. या प्रकरणी वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याचबरोबर मादी चिता गानिनी आणि तिच्या बछड्यांचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. 

भूपेंद्र यादव यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, 5 वर्षांची मादी गामिनी हिने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. त्याचबरोबर भारतात जन्मलेल्या बछड्याची संख्या 13 झाली आहे. भारताच्या भूमीवर आणण्यात आलेला चौथा मादी चित्ता आहे. वन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची एकूण संख्या 26 झाली आहे.  त्यांनी वन अधिकारी, पशुचिकित्सक आणि फिल्ड स्टाफसह सर्व चित्त्यांसाठी आवश्यक असलेले वातावरण तयार केल्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे. 

कुनोमध्ये दक्षिण अफ्रिकेतील नामीबियामधून दोन टप्प्यात एकूण 20 चित्ते आणण्यात आले होते. यातील सात चित्त्यांचा मृत्यू झाला होता. आता चित्त्यांच्या बछड्यांची संख्या 13 इतकी झाली आहे. 17 सप्टेंबर 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या चित्ता प्रोजेक्टसाठी खूप मोठे यश आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये 13 वयस्कर आणि 13 बछडे यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण चित्त्यांची संख्या 26 झाली आहे. 

या वर्षीच जानेवारी महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्येही आनंदाची बातमी समोर आली  होती. येथील आशा मादी चित्त्याने कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन बछड्यांना जन्म दिला होता. चित्त्यांची संख्या वाढत असताना हा संपूर्ण देशासाठई आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. 

दरम्यान, कुनो नॅशनल पार्कमध्ये सातत्याने होणाऱ्या चित्त्यांच्या मृत्यूने चिंतेचे वातावरण पसरले होते. तर, विरोधकांनीही मोदी सरकारवर टीका केली होती. भारतातील वातावरण दक्षिण अफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांसाठी अनुकुल नसल्याची टीका करण्यात येत होती.