वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तब्बल 30 वर्षांनंतर घरी परतला; चित्रपट बनवता येईल अशी रिअल स्टोरी

सात वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 30 वर्षांनंतर  बंदिवासातून  सुटका झाली. अखेर ‘अशी’ झाली कुटुंबियांशी पुनर्भेट. 

वनिता कांबळे | Updated: Nov 29, 2024, 10:03 PM IST
वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तब्बल 30 वर्षांनंतर घरी परतला; चित्रपट बनवता येईल अशी रिअल स्टोरी

Delhi Crime News:  वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला एक व्यक्ती तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या घरी परतल्याची घटना दिल्लीजवळील गाझियाबाद येथे उजेडात आली आहे. या व्यक्तीचे नाव राजू (वय ३७ वर्ष) असून बहि‍णीबरोबर शाळेतून परत येताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. साहिबाबाद येथील रहिवासी असलेला हा व्यक्ती ८ सप्टेंबर १९९३ या दिवशी गायब झाला होता. यासंबंधी कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती, मात्र त्याचा कसलाच सुगावा लागू शकला नाही. अखेर वयाच्या ३७ व्या वर्षी हा व्यक्ती स्वत:च्या घरी परतला आहे.

Add Zee News as a Preferred Source

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील धडकी भरवणारा फ्लायओव्हर! 30 मजली इमारती इतका उंच, खाली पाहिले तर चक्कर येईल 

घरी परतल्यानंतर या व्यक्तीने सांगितले की, तो आणि त्याची बहीण शाळेतून परतत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी राजूला राजस्थानला पाठवून दिले. तो इतकी वर्ष त्याच ठिकाणी होता. राजस्थानात पोहोचल्यानंतर त्याला दररोज मारहाण करून कामाला लावले जाई. त्या बदल्यात त्याला फक्त संध्याकाळी एक भाकर दिली जात असे. इतकेच नाही तर रात्री तो पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधून ठेवण्यात येत असे 

अखेर एका दिवशी त्याने स्वत:ची सुटका करून घेतली आणि दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये चढला. त्याला दिल्ली शहर आठवत होते मात्र तो कोणत्या भागात राहायचा आणि त्याच्या आई-वडीलांची नावे काय होती हे मात्र तो विसरून गेला होता. राजधानी दिल्लीत पोहचल्यानंतर त्याने असंख्य पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारल्या, पण त्याला कुठलीही मदत मिळाली नाही.

मात्र पाचएक दिवसांपूर्वी तो गाझियाबाद येथील खोडा पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. त्याने सांगितलं की, येथील पोलिसांनी त्याची चांगली काळजी घेतली. तसेच त्याला शूज दिले, जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. यानंतर पोलीसांनी राजूबद्दलची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली. यानंतर काही वेळातच राजूच्या काकांनी पोलीसांशी संपर्क साधला आणि त्याचे कुटुंबिय त्याला घ्यायला आले. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी रजनीश उपाध्याय यांनी सांगितले.

दरम्यान तब्बल ३० वर्षांनी घरी परतलेल्या राजूने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “मला आता खूप बरे वाटत आहे”. तो पुढे बोलताना म्हणाला की, “मी भगवान हनुमानाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून आणावी यासाठी मी त्यांच्याकडे सातत्याने प्रार्थना करत होतो”. पुढे बोलताना ३७ वर्षीय राजूने सांगितले की, ज्या व्यक्तीच्या घरी त्याला बंदी बनवून ठेवले होते, त्याच्या धाकट्या मुलीने त्याला भगवान हनुमानाची पूजा करण्यास सांगितले. तसेच त्याला पळून जाण्यास आणि आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले.  

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More