एक चूक आणि माणूस थेट ढगात... मिश्रण चुकल्याने जीवघेणी ठरतेय विषारी दारु

Saran hooch tragedy :  बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी विषारी दारु प्यायल्यामुळे 29 जणांचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे बिहारमध्ये गेल्या सहा वर्षांपासून दारुबंदी आहे.

Updated: Dec 17, 2022, 07:23 PM IST
एक चूक आणि माणूस थेट ढगात... मिश्रण चुकल्याने जीवघेणी ठरतेय विषारी दारु title=

Bihar liquor Row : बिहारमध्ये विषारी देशी दारु प्यायल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये देशी दारु प्यायल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या 29 वर पोहोचली आहे (Saran hooch tragedy). यातील 27 लोक हे छपरा जिल्ह्यातील तर दोन पाटणा जिल्ह्यातील आहेत. सातत्याने बिहारमध्ये विषारी दारू प्यायलामुळे अनेकांचा मृत्यू झालाय. बिहारमध्ये गेल्या सहा वर्षांपासून दारुबंदी आहे. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतच आहेत.

या मृत्यूंनतर राजकारणही सुरु झालंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनीही दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. ज्या दारूमुळे हे सर्व मृत्यू झालेत ती बाजारात उपलब्ध असलेल्या मद्य बनवण्याच्या पद्धतीमध्ये कुठेही बनत नाही. पण ही दारू विषारी कशी होते आणि देशी दारू कशी बनते?

अशा विषारी दारुसाठी हूच (Hooch) हा शब्द वापरला जातो. हा शब्द अलास्का येथील हुचिनो जमातीपासून बनलेला आहे. हुचिनो आदिवासी हे अत्यंत दारू बनवण्यासाठी ओळखले जातात. ब्रँडेड मद्य हे सुसज्ज असे तंत्रज्ञान असलेल्या मशिनमधून बनवले जाते. त्याची बारकाईने गुणवत्ता तपासली जाते. याउलट कच्ची दारू ही साध्या तंत्राच्या मदतीने गुणवत्ता तपासल्याशिवाय बनवली जाते.

हूच ब्रँडेड मद्यांमुळे इतर मद्यांच्या तुलनेत जास्त नशा होते. मात्र ती बनवण्यात काही गडबड झाली तर त्याच्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. तसेच ती पिण्याआधी सुरक्षित आहे की नाही हे सुद्धा तपासता येत नाही.

मद्य बनवण्याच्या दोन पद्धती कोणत्या?

फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन या प्रक्रियांद्वारे अशा प्रकारची दारु बनवली जाते. धान्य, फळे, ऊस इत्यांदींना फर्मेंट करुन म्हणजेच आंबवून बिअर आणि वाइन बनवली जाते. तर व्हिस्की, वोडका, जिन हे डिस्टिलेशन पद्धतीद्वारे बनवली जाते. यासाठी जेथे हवा अथवा ऑक्सिजन नाही अशा बंदिस्त भट्टीत बनवतात.

हूच कशी बनवली जाते?

या प्रकारचे मद्यही डिस्टिलेशन पद्धतीद्वारे बनवले जाते. सर्वात आधी  यीस्ट आणि साखर किंवा बहुतेकदा कुजलेली फळे फर्मेंटेशनसाठी मोठ्या भांड्यात गरम केली जातात. पुरेसा फर्मेंटेशन झाल्यानंतर, साध्या तंत्राचा वापर करुन या मिश्रणाते डिस्टिलेशन केले जाते. त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात हे मिश्रण उकळवले जाते. यातून निघणाऱ्या वाफेला एका पाईपच्या आधारे दुसऱ्या भांड्यात काढले जाते. ज्या भांड्यात ही वाफ काढली जाते ते थंड ठेवण्यासाठी त्याच्यावर ओले कापड गुंडाळले जाते. या भांड्यात जमा होणारा द्रव्य म्हणजे मद्य. यामध्ये मद्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पुन्हा हीच प्रक्रिया केली जाते.

पण हे विषारी कसं बनतं?

अशा प्रकारचे मद्य बनवताना वापरलेले तंत्रच ते विषारी होण्यासाठी कारणीभूत ठरते. डिस्टिल्ड करण्यासाठी आंबलेल्या मिश्रणात इथेनॉल आधीच जास्त असते. यासोबत त्यात मिथेनॉल देखील असते. मिथेनॉल हे मानवी शरीरासाठी अधिक धोकादायक असतं. याचा वापर प्रामुख्याने औद्योगिक कामांमध्ये केला जातो. मद्य बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हे दोन्ही घटक एकत्र येतात.

तामनात गडबड झाली की बिघडतं गणित

मिथेनॉलचा उत्कलन बिंदू 64.7 अंश सेल्सियस आहे. तर इथेनॉलचा उत्कलन बिंदू 78.37 अंश सेल्सियस आहे. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान हे मिश्रण 64.7 अंश सेल्सियस पर्यंत तापते, तेव्हा मद्य गोळा होण्याऱ्या भांड्यात अत्यंत विषारी रसायनाने तयार होऊ लागते. त्यामुळे योग्य मद्याचे उत्पादन मिळण्यासाठी तापमना तापमान 78.37 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त पण 100 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी असणे महत्वाचे असते.