Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमी

Balabhadra Idol Falls In Puri In: पुरी येथील रथयात्रा भारतात खूप लोकप्रिय आहे. यावेळी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 10, 2024, 11:21 AM IST
Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमी title=
Idol of Lord Balabhadra falls on servitors during Rath Yatra 8 injured

Balabhadra Idol Falls In Puri In: ओडिशायेथील पुरी सध्या चर्चेत आहे. जग्गनाथ पुरीची यात्रा आणि रथयात्रेत लाखो भाविक सहभागी झाले होते. मात्र, मंगळवारी रथ यात्रा पार पडल्यानंतर भगवान बलभद्र यांचे मूर्ती कोसळल्याने 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा संध्याकाळी तीन्ही मूर्ती रथातून उतरवून गुंडिचा मंदिरातील अडापा मंडपात नेण्यात येत होत्या. 

मंदिरातील अन्य अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतक मूर्तींची पहांडी सुरू झाली होती. तिथे तीन मूर्ती सेवक हळूहळू पुढे नेत होते. सेवक मंडपात मूर्ती नेत होते. त्याचवेळी जेव्हा भगवान बलभद्र यांची मूर्ती रथ तलध्वजमधून उतरवण्यात येत होती तेव्हा मूर्ती रथातून कोसळली आणि तिथे असलेल्या सेवकांवर पडली. या प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांनी म्हटलं की, एकूण 8 लोक जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, तिथे असलेल्या काही लोकांना किरकोळ जखमा आल्या आहेत. मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नाहीये. जखमींवर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी पुरीमध्ये रथ यात्रा काढण्यात आली होती. मात्र, या यात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यात अनेक जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर रथ खेचतानादेखील एक दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. रथ यात्रेच्या दरम्यान 180 प्लाटून तैनात होते. (१ प्लाटूनमध्ये 90 जवान असतात). तीर्थ नगरीतील अनेक महत्त्वपूर्ण स्थानांवर आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित असलेले सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. 

सनातन धर्मात जगन्नाथ रथ यात्रेला खास महत्त्व आहे. रथयात्रा काढून भगवान जगन्नाथ यांना प्रसिद्ध गुंडिचा मातेच्या मंदिरात आणलं जातं. जिथे भगवान सात दिवस आराम करतात. यावेळी गुंडिचा माता मंदिरात खास तयारी केली जाते. मंदिराच्या साफसफाईसाठी इंद्रद्युम्न सरोवरातून जल आणले जाते. त्यानंतर भगवान जगन्नाथ यांच्या परतीची यात्रा सुरू होते. या यात्रेचे हिंदु धर्मात खूप महत्त्व आहे. तसंच, रथ यात्रेत हजारो भाविक भव्य रथांना पाहण्यासाठी आणि रथ खेचण्यासाठी एकत्रित येतात. 

भगवान जग्गनाथ रथयात्रा आषाढ शुल्क पक्षाच्या द्वितीयेपासून प्रारंभ होते. रथयात्रेत सगळ्यात पुढे तालध्वज असतो त्यावर श्री बलराम असतात. नंतर पद्मध्वज असतो ज्यावर सुभद्रा आणि सुदर्शन चक्र असतात.  सगळ्यात शेवटी गरुड ध्वज असतो त्यावर श्री जगन्नाथ जी असतात. जे सगळ्यात शेवटी असतात.