40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

India Canada Trade: भारत आणि कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत आणि कॅनडामधील या तणावपूर्ण संबंधांचा फटका दोन्ही देशांमध्ये व्यापर करणाऱ्या कंपन्यांना बसू शकतो.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2023, 08:28 AM IST
40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात' title=
भारत आणि कॅनडामधील संबंध शिगेला

India Canada Trade: कॅनडा आणि भारतादरम्यान राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खरं तर भारत आणि कॅनडादरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॅनडाला बसू शकतो मोठा फटका

खरोखरच असं झालं तर भारतीय कंपन्यांबरोबरच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांची संख्या हजारोंमध्ये असून अनेक कॅनडीयन लोक या कंपन्यांमध्ये काम करतात. कॅनडासाठी भारतीय कंपन्या फार महत्त्वाच्या आहेत कारण या कंपन्यांच्या माध्यमातूनर परदेशी व्यपार कॅनडामध्ये येत आहे. या कंपन्यांनी मोठा निधी कॅनडामध्ये गुंतवला आहे. मे 2023 मध्ये 'फ्रॉम इंडिया टू कॅनडा : इकनॉमिक इम्पॅक्ट अॅण्ड एगेजमेंट' या नावाचा अहवाल जाहीर झाला. हा अहवाल कॉन्फ्रेडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज म्हणजेच सीआयआयने जारी केला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल टोरंटोच्या दौऱ्यावर असताना हा अहवाल जारी करण्यात आला होता. या अहवालामधील आकडेवारीमधून केवळ श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि आखाती देशांबरोबरच कॅनडासाठी भारत किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आलं. कॅनडामधील भारतीय कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे. भारतीय कंपन्यांचा कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवरील प्रभाव वाढत असून रोजगार निर्मितीमध्येही भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत. 

40 हजार 446 कोटींची गुंतवणूक

'फ्रॉम इंडिया टू कॅनडा : इकनॉमिक इम्पॅक्ट अॅण्ड एगेजमेंट' या अहवालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सध्याच्या स्थितीमध्ये भारत-कॅनडा वादाला उद्योगांना किती फटका बसू शकतो याचा अंदाज बांधता येतो. कॅनडामध्ये हजारो भारतीय कंपन्या असल्या तरी कोट्यवधींची उलाढाल असलेल्या 30 मोठ्या भारतीय कंपन्या आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. या मोठ्या कंपन्यांनी कॅनडामध्ये 40 हजार 446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच या कंपन्यांपैकी 85 टक्के कंपन्या आपली कॅनडामधील गुंतवणूक वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कॅनडाला भारताबरोबरच हा वाद फारसा परडवणारा दिसत नाही.

17 हजार लोकांना रोजगार

कॅनडामध्ये असलेल्या भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून 17 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटसाठीचा खर्च 700 मिलियन कॅनडियन डॉलर इतका आहे. या अहवालामध्ये कॅनडातील भारतीय लोक तेथे व्यापर दिवसोंदिवस वाढवत असून याचा तेथील अर्थव्यवस्थेला फायदा होत असल्याचं म्हटलं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.

इन्फोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्याही कॅनडात कार्यरत

भारत आणि कॅनडामध्ये अनेक व्यापारी करार असल्याने दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात आहे. कॅनडामधील पेन्शन फंडांमध्ये भारताची 55 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या कॅनडात कार्यरत आहेत. त्याशिवाय सॉफ्टवेअर, नौसर्गिक स्त्रोत, बँकिंग यासारख्या क्षेत्रांमध्येही कॅनडात भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. इन्फोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्या कॅनडामधूनही कार्यरत आहेत. 2022 मध्ये व्यापाराच्या दृष्टीने कॅनडा हा भारताबरोबर आर्थिक व्यवहार करणारा 10 महत्त्वाचा देश होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कॅनडाला भारताने 4.10 अब्ज डॉलर्सचं सामान पाठवलं. तर 2022-23 मध्ये कॅनडाने भारतात 4.05 अब्ज डॉलर्सचं सामान पाठवलं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा 2021-22 मध्ये 7 अब्ज डॉलर्स इतका होता. पुढील वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये तो 8.16 अब्ज कोटींवर गेला.