बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर

Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत. 

राजीव कासले | Updated: Nov 15, 2023, 09:29 PM IST
बाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर title=

Uttarkashi Tunnel Collapsed News : उत्तराखंड बोगद्यात (Uttarakhand Tunnel) अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी सलग चौथ्या दिवशी बचावकार्य (Rescue Operation) सुरु आहे. कामगारांना वाचवण्यासाठी  दिल्ली मेट्रो, नॉर्वे आणि थायलंड इथल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जात आहे. बोगद्यात जवळपास 40 कामगार अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या 40 कामगारांमध्ये एकआहेत उत्तराखंडच्या कोटद्वार इथं राहाणारे गबर सिंह नेगी (Gabar Singh Negi). गेल्या तीन दिवसांपासून गबर सिंह नेगी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

गबर सिंह नेगी यांचं उत्तर
गबर सिंग नेगी हे बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे सुपरवायझर आहेत. बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना प्रोत्साहन आणि हिम्मत देण्याचं काम गबर सिंह नेगी करतायत. त्यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत. गेल्या ३ दिवसांपासून त्यांचं कुटुंबं ते बोगद्यातून बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. गबर सिंह यांचा मोठा मुलगा आकाशने मंगळवारी संध्याकाळी पाईपद्वारे आपल्या बाबांशी बातचीत केली.  आकाशने आपल्या बाबांना कसे आहात असा प्रश्न विचावला. यावर मी माझ्या मित्रांना घेऊनच बाहेर येईन, सर्वांचं मनोबल उंचावलं आहे. काळजी करु नका, कुटुंबाची काळजी घ्या. असं उत्तर गबर सिंह यांनी दिलं. पण आकाशच्या मते बोगद्यात कामगारांना खाण्या-पिण्याबाबत काही अडचणीत येत आहेत. 

बचावकार्यावर कुटुंब नाराज
गबर सिंह यांच्याप्रमाणे इतर 39 कामगारांचं कुटुंबही बोगद्याच्या बाहेर बसून वाट पाहात आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचावकार्यावर अडकून पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. बचाव कार्यात उशीर होत असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बोगद्यात झारखंडचे 15, उत्तरप्रदेशचे 8, ओडिशाचे 5, बिहारचे 4, पश्चिम बंगालचे 3, उत्तराखंडचे 2, आसामचे 2 आणि हिमाचल प्रदेशचा एक कामगार अडकले आहेत. सर्वात जास्त कामगार झारखंड राज्याचे आहेत. 

धरासू आणि बडकोटदरम्यान बोगदा तयार केला जात असून 12 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता मातीचा मोठा ढिगारा कोसळला आणि बोगदा बंद झाला. त्यामुळे बोगद्यात आतमध्ये काम करणारे चाळीस कामगार अडकले. 

दरम्यान बचाव कार्यात एअरफोर्सचही मदत घेतली जात आहे. सरकारी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एअरफोर्सच्या तीन विमानांनी 25 टन भारी मशीन मागवण्यात आल्या. माती उपसण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे. पण बचावकार्यात अनेक अढथळे निर्माण होतायत, सतत माती कोसळत असून काही मशिनरीज खराब झाल्या होत्या.