Jharkhand Election : Exit poll चा अंदाज खरा, सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलचा (Exit poll) अंदाज खरा.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2019, 12:17 PM IST
Jharkhand Election : Exit poll चा अंदाज खरा, सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का title=

मुंबई : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीला (Jharkhand Election Results) सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळीच काँग्रेसच्या बाजुने कल येऊ लागल्याने भाजपची सत्ता जाणार याचे स्पष्ट संकेत मिळत होते. त्याचवेळी भाजपने त्यानंतर जोरदार टक्कर दिल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसने (congress) आपली आघाडी कायम राखत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का दिला. दरम्यान, झारखंडमध्ये मतदानोत्तर घेण्यात आलेल्या चाचणी अर्थात एक्झिट पोलमध्ये (Exit poll) भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. भाजपचे पानिपत झाले तर काँग्रेस-झामुमोने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे.

झारखंड निवडणूक निकाल 2019 LIVE

झारखंड राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवलेला आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोल ( Exit poll) निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरले. बहुतांश एक्झिट पोल्सनी झारखंडमध्ये भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तविला होता. तो आता खरा ठरत असल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस-झामुमो आघाडी बहुमत मिळवून सत्तेत येईल, असा या एक्झिट पोल्सचा अंदाज होता. 

मात्र, त्यापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सची आकडेवारी भाजपसाठी निराशादायक ठरली. २०१४ च्या निवडणुकीत झारखंडमध्ये भाजप ३७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर जेएमएमला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तविली होती. ते भाकीत खरे ठरले आहे. भाजपला ३० जागा मिळताना दिसत आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने कलम ३७० आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून प्रचार केला होता. मात्र, निवडणूक शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला होता. याउलट विरोधकांनी बेरोजगारी, पाण्याची समस्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आदी मुद्द्यांवर प्रचारावर भर दिला होता. एक्झिट पोल्सच्या निकालानंतर भाजपला जोरदार धक्का बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. असे असताना भाजपने आपण पुन्हा बहुमत मिळवत सत्तेत येण्याचा दावा केला होता. तो दावा चुकला आहे.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस-झामुमो आघाडीला झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल. ८१ जागांपैकी जेएमएम-काँग्रेस आघाडीला ४४ जागा मिळण्याचे संकेत दिले होते. तो आकडा जवळपास आहे. भाजपला २८ जागांवर समाधान मानावे लागेल असे म्हटले होते. सध्या भाजप ३० जागांवर आघाडीवर आहे. निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. तर इतरांना ९ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, इतरांना तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे.

एएनएम-सी व्होटर-एबीपी (ANS-CVoter-ABP) च्या एक्झिट पोलनुसार भाजपला यंदा २८ ते ३६ जागा मिळतील. तर काँग्रेस-झामुमो आघाडीला ३१ ते ३९ पडतील. त्यामुळे अपक्षांची मदत घेत ४१ हा बहुमताचा आकडा पार करेल असे म्हटले होते. मात्र, काँग्रेस-झामुमो आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येत आहे. भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. अंतिम निकाल येण्यास अजून वेळ आहे.

आज तक - झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमो आघाडीला (Congress-JMM) आघाडीला ३८ ते ५० जागा तर भाजपला २२ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय, जेव्हीएम २-४, तर एजेएसयू ३-५ आणि अपक्षांना ४ ते ७ जागा मिळत असे भाकीत वर्तविण्यात आले होते. हा अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे. 

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया - काँग्रेस-झामुमो आघाडीला ३८ ते ५० जागा मिळतील. तर भाजपला केवळ २२ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज होता. हा अंदाज खरा होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-झामुमो आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट होत आहे. 

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट -  झारखंड निवडणुकीत भाजपला २२ ते ३२ जागाच जिंकता येतील. तर  काँग्रेस-झामुमो आघाडीला ३८ ते ५० जागा मिळतील असे वर्तविण्यात आले होते. हा पोल खरा होताना दिसत आहे. भाजपला ३०, काँग्रेसला ४०, जेएमएमला ४ अन्य ३ अशी आघाडी दिसून येत आहे.