कर्नाटक निकाल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारणार?

काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर कर्नाटकातला पराभव हा राहुल गांधी यांचा पहिलाच पराभव ठरलाय.

Updated: May 15, 2018, 11:35 AM IST
कर्नाटक निकाल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारणार? title=

नवी दिल्ली : कर्नाटकच्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसकडे केवळ तीन राज्य उरलीत. कर्नाटक हे काँग्रेसनं हातातून गमावलेलं १२ वं राज्य ठरलंय. म्हणजेच भाजप मॅजिक फिगर गाठण्यात यशस्वी ठरलंय. कर्नाटकच्या सर्व म्हणजेच २२२ जागांचा कल हाती आलाय. भाजपला ११४ जागांवर आघाडी मिळालीय. त्यामुळे आता, कर्नाटकात भाजप आपल्या बळावर सरकार स्थापन करणार असल्याचं चित्रं उघड झालंय. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब सोडून जेवढ्या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्यात तिथं काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय.... तर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर कर्नाटकातला पराभव हा राहुल गांधी यांचा पहिलाच पराभव ठरलाय. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? की या पराभवाचीही कारणं देणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.  

भाजपला निर्विवाद बहुमत

कर्नाटकात भाजपाला सुरूवातीला मिळालेल्या आघाडीत, निर्विवाद बहुमत मिळालं आहे. भाजपाचा कर्नाटकात हा दमदार विजय मानला जात आहे. भाजपाने बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. भाजपा ११४, काँग्रेस ६४, जेडीएस ४२ तर ०२ अपक्ष निवडून आले आहेत. काँग्रेसनं कर्नाटकातील सत्ता गमावली आहे, तर कर्नाटकाचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामैय्या दोन मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत होते, सिद्धरामैय्या हे दोन्ही ठिकाणी पिछाडीवर आहेत. (अपडेट लाईव्ह पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live )  बंगळुरूत भाजपा कार्यालयासमोर जल्लोष सुरू आहे. भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापनेचा भाजपाचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हा त्यांच्या नेतृत्वातला पहिला पराभव मानला जात आहे. यामुळे दक्षिण भारतात भाजपाने मोठी मुसंडी मारली असल्याचं म्हटलं जात आहे

सोशल मीडियावर ट्रोलिंग

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय. एकीकडे भाजपच्या पारड्यात मोठ्या संख्येने मते पडतातयत मात्र दुसरीकडे काँग्रेस मोठ्या संख्येने पिछाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल येणे सुरु होताच सोशल मीडियावरही काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात झालीये. सुरुवातीला काँग्रेस- भाजप यांच्यात जोरदार काँटे की टक्कर होती. मात्र त्यानंतर हळूहळू काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक युझर्सनी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली.