मृतदेह फ्रीज, कपाटात: पत्नीसह तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या

ही घटना तुमचे लक्ष विचलीत करू शकते. 

Updated: Aug 21, 2018, 01:40 PM IST
मृतदेह फ्रीज, कपाटात: पत्नीसह तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या title=

अलाहाबाद: ही घटना तुमचे लक्ष विचलीत करू शकते. घटना आहे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील एका क्रूर पतीची. ज्याने आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य तर संपवलेच. पण, सोबत पत्नी आणि तीन मुलींचेही आयुष्य संपवले. घटना इतकी क्रूर की, आरोपीने पत्नी, मुलींची हत्या केल्यावर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीज आणि कपाटात कोंबून ठेवले.

संतापाच्या भरात जीवघेणे कृत्य

प्राप्त माहिती अशी, मनोज कुशवाहा नावाचा व्यक्ती आपली पत्नी श्वेता आणि तीन मुलींसोबत धुमनगंज परिसरातील पीपल गावात राहात होता. गेल्या रविवारी (१९ ऑगस्ट २०१८) संध्याकाळी आरोपी मनोज आणि त्याच्या पत्नीचे काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, संतापाच्या भरात मनोजने पत्नी आणि तिन्ही मुलींची हत्या केली. त्याने पहिल्यांदा पत्नी आणि त्यानंतर तिन्ही मुलींना मारले. प्रिती, श्रेया, आणि शिवानी (वय अनुक्रमे ८,६ आणि ३ वर्षे) अशी मृत मुलींची नावे आहेत.

मृतदेह फ्रिज आणि कपाटात

रागाच्या भरात आपण काय करून बसलो, हे हत्या केल्यानंतर भानावर आलेल्या मनोजच्या ध्यानात आले. आपल्या कृत्याने घाबरलेल्या आणि गर्बगळीत झालेल्या मनोजने पत्नी श्वेताच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. मोठी मुलगी प्रिती आणि शिवानेचा मृतदेह त्याने कपाटांत बंद केला. तर, श्रेयाचा मृतदेह त्याने जमीनीवरच ठेवला. चार हत्या करून रक्ताच्या नात्याचा शेवट केल्यानंतर मनोजने स्वत: पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

टीव्हीचा आवाज वाढवून भांडण सुरू

मनोज आणि त्याच्या पत्नीत वाद सुरू होता तेव्हा टीव्हीचा आवाज मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे घरात घडत असलेल्या कृत्याबाबत शेजारच्यांना कळले किंवा संशय आला नाही. सोमवारी संध्याकाळी मनोजचे वडील गुलाब कुशवाहा जेव्हा आपल्या घरी पोहोचले तेव्हा घर आतून बंद असल्याचा आणि टीव्हीचा आवाज मोठा असल्याचे ध्यानात आले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावले. दरम्यान, पोलिसांनाही कळविण्यात आले.

दरवाजा तोडून पोलीस घरात

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. समोरचे दृश्य अत्यंत भयंकर होते. व्यवसायाने शेतकरी असलेला मनोज पंख्याला लटकला होता. तर, श्रेयाचा मृतदेह समोर दिसत होता. पोलिसांनी घराची झडती घेताल इतर दोन मुली आणि पत्नीचाही मृतदेह मिळाला. फॉरेन्सीक लॅबचा रिपोर्ट अद्याप यायचा आहे. पण, पत्नीची हत्या केल्यावर मनोजने तिन्ही मुलींना विष देऊन ठार केले. व त्यानंतर स्वत:चे आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.