गुजरातचा अपघात 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे' की.... पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत विरोधकांचा खडा सवाल

गुजरातमधील या अपघातात आतापर्यंत 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय

Updated: Oct 31, 2022, 08:59 AM IST
गुजरातचा अपघात 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे' की.... पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत विरोधकांचा खडा सवाल title=

गुजरातमधील (Gujarat) मोरबी (Morbi) येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत (cable bridge collapses) आतापर्यंत 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्यात सुमारे 180 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. 19 जणांवर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर गुजरातमधील सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजप (BJP) आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. गुजरातमधील (gujarat) या अपघातानंतर ट्विटरवर Act of God हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. (Morbi Cable Bridge Opposition attacked on pm modi reminded Kolkata flyover accident)

कोलकाता (kolkata) येथील विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेनंतर 2016 मध्ये त्यांनी केलेल्या विधानाची विरोधी पक्षनेते पंतप्रधान मोदींना ( PM Narendra Modi) आठवण करून देत आहेत. त्यावेळी पश्चिम बंगालच्या (west bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हे दैवी कृत्य आहे. आता ट्विटर युजर्ससह काँग्रेस (Congress) नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी ट्विट करत मोदीजी, मोरबी पूल दुर्घटना ही दैवी घटना आहे की फसवणूक? असे विचारले आहे.

गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यातील मच्छू नदीवर बांधलेला हा केबल ब्रिज (cable bridge) रविवारी संध्याकाळी गर्दीमुळे कोसळला. या अपघातात आतापर्यंत 135 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतीय लष्कर (Indian Army), नौदल, हवाई दल, एनडीआरएफ (NDRF), अग्निशमन दल आणि पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. अपघातानंतर गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (bhupendra patel) यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावा घेतला.

आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एकामागून एक ट्विट करत भाजप आणि पंतप्रधान मोदींना घेरले आहे.  "मोदी जी मोरबीच्या पुलाची घटना Act of God आहे की Act of Fraud? 6 महिन्यांपासून पुलाची दुरुस्ती सुरू होती, किती खर्च झाला? पाच दिवसात पूल पडला! 27 वर्षे भाजपचे सरकार आहे, हे आहे तुमचे विकासाचे मॉडेल? या वर्षी जुलैमध्ये कच्छ जिल्ह्यातील बिद्रा गावात पहिल्या दिवशीच्या चाचणीत नर्मदा कालवा फुटला. 8-9 वर्षांपासून बांधण्यात आलेल्या भुज शहरातील ओव्हरब्रिजचे उद्घाटन या वर्षी झाले आणि पुन्हा दुरुस्ती करावी लागली. मला सांगण्यात आले आहे की संपूर्ण गुजरातमध्ये फक्त मोदी शाहांच्या आवडत्या कंत्राटदारांनाच कंत्राट मिळते. काम पूर्ण होवो किंवा  नाही, पेमेंट पूर्ण होते!!," असे दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

31 मार्च 2016 रोजी कोलकाता येथील विवेकानंद रोड फ्लायओव्हर कोसळला होता. या अपघातात अनेकांचा मृत्यूही झाला. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकास्त्र सोडले होता. त्यावेळी पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य आता गुजरात घटनेनंतर व्हायरल होत आहे. त्यावेळी "हे दैवी कृत्य आहे कारण निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी ही दुर्घटना घडली आहे, जेणेकरून लोकांना कळेल की त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे सरकार आहे. देवाने हा संदेश दिला आहे की आज हा पूल कोसळला आहे, उद्या त्या (ममता बॅनर्जी) संपूर्ण बंगालचा नाश करतील," असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते