मुंबईतल्या पावसानं 'चेरापुंजी'चा रेकॉर्ड मोडला

या पावसात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय

Updated: Jun 25, 2018, 04:34 PM IST
मुंबईतल्या पावसानं 'चेरापुंजी'चा रेकॉर्ड मोडला   title=

मुंबई : गेल्या २४ तासात मुंबईला जोरदार पावसानं झोडपून काढलंय. गेल्या २४ तासात मुंबई  आणि उपनगरात २३१ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. यंदाच्या पावसाळ्यात हा सर्वाधिक पाऊस आहे. विशेष म्हणजे देशातलील सर्वात जास्त पाऊस जिथे पडतो, त्या चेरापुंजीपेक्षाही कालपासून मुंबईत पावसाचा जोर काय आहे. चेरापुंजीत रविवारी २२८ मिलीमिटर पाऊस झाला. त्यामुळे सर्वाधिक पर्जन्यमानाच्या शहरापेक्षाही मुंबईत पाऊस जास्त झाल्याचं दिसून येतंय.

मुंबईत तीन जणांनी गमावला जीव

या पावसात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेलाय. त्यात मेट्रो टॉकिजजवळ काल झाड पडलं. त्याखाली दोन वृद्धांचा बळी गेलाय... तर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मालाडच्या एव्हरशाईन नगरमध्ये नाल्यात पडून एक तरूण दगावला. नागेंद्र नागार्जुन असं या तरुणाचं नाव असून तो केवळ अठरा वर्षांचा होता. 

चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये वरुणराजा मुंबई आणि महाराष्ट्रावर चांगलाच प्रसन्न झालेला आहे. मुंबई, मुंबई उपनगरं, ठाणे, कोकण किनारपट्टीतल्या भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या या पावसाने चेरापुंजीचा विक्रमही मोडीत काढला आहे. चेरापुंजी हे भारतातलं सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं शहर आहे. रविवारी चेरापुंजीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र मुंबईने गेल्या २४ तासात हा विक्रम मोडीत काढला आहे.

गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक पाऊस पडलेली १० शहरं पुढीलप्रमाणे – (पाऊस मिमी मध्ये)

सांताक्रुझ (मुंबई) – २३१

डहाणू – २२६

कुलाबा (मुंबई) – ९९

चेरापूंजी – २२८

दार्जिलींग – ८२

शिराली (कर्नाटक) – ७५

पारादीप (ओडीशा) – ६०

वलसाड (गुजरात) – ५५

हर्णे (महाराष्ट्र) – ५४

गंगटोक (सिक्कीम) – ५०

(वरील माहिती स्कायमेट या संकेतस्थळावरुन घेतलेली आहे)