Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा

Nepal Earthquake : शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास नेपाळमध्ये एक प्रचंड भूकंप आला. इथं जग यंदाच्या वर्षी झालेल्या भूकंपांमधून सावरत नाही तोच भारतातही या आपत्तीची भीती पाहायला मिळाली.   

सायली पाटील | Updated: Nov 4, 2023, 09:46 AM IST
Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा  title=
Nepal Earthquake 6 4 scale deli ncr bhiar felt tremor latest news

Nepal Earthquake : दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. नेपाळमध्ये झालेल्या 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के उत्तर भारतालाही बसले. ज्यामध्ये दिल्लीसह बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशला भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाने नेपाळमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 

मृतांचा आकडा वाढला 

नेपाळमध्ये झालेला भूकंप इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की या भूकंपात आतापर्यंत 140 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही तासांत हा आकडा वाढू शकतो अशी भीती स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी व्यक्त केली आहे. नेपाळमधील रकुम येथील पश्चिमेकडे असणाऱ्या प्रांतामध्ये 36 तर, जाजरकोटमध्ये आतापर्यंत 92 नागरिकांचा मृत्यू ओढावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

हेसुद्धा वाचा : कुणबी नोंदी महाराष्ट्रभर शोधा; मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमंतर शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर

देशावर आलेलं हे संकट पाहता नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या महाभयंकर भूकंपानंतर बचावकार्यासाठी तीन सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती मिळत आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, दिल्ली आणि उत्तर भारतातही हादरे जाणवले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानकच भूकंप जाणवल्यानं उंच इमारतींपासून बंगल्यांमध्ये राहणारी मंडळीसुद्धा गोंधळल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये असे धरणीकंप जाणवण्याची ही दुसरी वेळ. 

भूकंप येण्याचं प्रमाण वाढतंय...

मागील काही महिन्यांपासून नेपाळमध्ये भूकंप येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळमध्येच होता. राहिला प्रश्न भूकंप का येतो यासंदर्भातला तर, पृथ्वीचा पृष्ठ सात टेक्टोनिक पदरांपासून किंवा थरांपासून तयार झाला आहे. जेव्हाजेव्हा हे थर एकमेकांवर आदळतात तेव्हातेव्हा भूकंपाचं संकट ओढावतं. भूकंप तेव्हाच येतो जेव्हा एखादा दर दुसऱ्या थराच्या क्षेत्रात जातो. दोन थर जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा प्रचंड उर्जा निर्माण होते आणि त्या घर्षणातून धरणीकंप होतो. अनेकदा पृथ्वीच्या पृष्ठाला तडेही जातात. बऱ्याचदा ही कंपनी महिन्याभरासाठीही जाणवतात. त्यांना आफ्टरशॉक असंही म्हणतात.