नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना या घटनेनं बसला होता धक्का, त्यानंतर आले राजकारणात

जगदीप धनखड यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. आता ते देशाचे नवे उपराष्ट्रपती बनणार आहेत.

Updated: Aug 6, 2022, 08:47 PM IST
नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना या घटनेनं बसला होता धक्का, त्यानंतर आले राजकारणात title=

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. जगदीप धनखड यांना 528 मते तर मार्गारेट अल्वा यांना 128 मते मिळाली आहेत.

राजस्थानमधील झुंझुनू या छोट्या जिल्ह्यातून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या धनखड यांनी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. पण ते लढले. आज ते उपराष्ट्रपती झाले आहेत. जगदीप धनकड यांचा जीवन प्रवास संघर्षमय होता.

जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किथाना येथे झाला. वडिलांचे नाव गोकलचंद आणि आईचे नाव केसरी देवी आहे. जगदीप त्याच्या चार भावंडांमध्ये दुसऱ्या नंबरचे आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण किठाणा गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयातून झाले. गावातून इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गरधना येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

बारावीनंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर धनखड यांनी आयआयटी आणि नंतर एनडीएसाठी निवड झाली, पण ते गेले नाहीत. पदवीनंतर त्यांनी देशातील सर्वात मोठी नागरी सेवा परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र, आयएएस होण्याऐवजी त्यांनी कायद्याचा व्यवसाय निवडला. राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली सुरू केली. ते राजस्थान बार कौन्सिलचे अध्यक्षही होते.

राजकीय प्रवास

धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलातून केली. धनखड 1989 मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच त्यांना मोठं पद मिळालं. 1989 ते 1991 या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते.

1991 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनड यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1993 मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. 2003 मध्ये त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.

14 वर्षांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने धक्का

धनखड यांचा विवाह सुदेश धनखर यांच्याशी 1979 मध्ये झाला होता. दोघांना दोन मुले होती. मुलाचे नाव दीपक आणि मुलीचे नाव कामना. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 1994 मध्ये दीपक 14 वर्षांचा असताना त्याला ब्रेन हॅमरेज झाला. त्याला उपचारासाठी दिल्लीतही आणण्यात आले, मात्र मुलगा वाचू शकला नाही. मुलाच्या मृत्यूने जगदीप धनगड यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यांनी स्वत:ला सावरले.