छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर  सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 12, 2024, 08:47 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव  title=

Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र, कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले. याप्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. 

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे. घडलेल्या दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडावं हेतूने ही संकल्पना मांडण्यात आली. सरकारच्या वतीने डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. 

दिपक केसरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल, यासाठी हा अपघात झालाय, असा अजब तर्क मंत्री दीपक केसरकरांनी काढलाय.. त्यांच्या या अजब दाव्यामुळे वाद निर्माण झाला होता. 

विरोधकांची टीका

मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. लोकसभेत मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारून पुन्हा पंतप्रधान मोदींना उद्घाटनासाठी बोलावणार, असं उत्तर मंत्री दीपक केसरकरांनी संजय राऊतांना दिलंय. तर पुन्हा पुतळा उभारू देणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दिलीय.