पासपोर्ट नियमांमध्ये बदल, मोबाइल अॅप लॉन्च

पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Surendra Gangan Updated: Jun 26, 2018, 09:12 PM IST
पासपोर्ट नियमांमध्ये बदल, मोबाइल अॅप लॉन्च title=

नवी दिल्ली : आता पासपोर्ट काढणे अधिक सोपे झाले आहे. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जन्मदाखल्यासाठी नवीन पर्यायही देण्यात आले आहेत. तसेच मोबाईल अॅपही लॉन्च करण्यात आलेय. त्यामुळे कोठूनही आता पासपोर्ट काढणे सोपे झाले आहे. त्यामुळे पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु झालाय.  पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. 

पासपोर्टसाठी सुटसुटीत नियम

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत माहिती देताना पासपोर्ट बनवताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आणि या अडचणी संपवल्याची घोषणा केली. आता पासपोर्ट बनवण्यासाठी लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी माहिती त्यांनी दिली. पासपोर्टसाठीचे अनेक जुने आणि अडचणीचे नियम बदलले असून सामान्य व्यक्तीच्या दृष्टीकोनातून सुटसुटीत नियम बनवण्यात आलेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. यासाठी पासपोर्ट सेवा अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली.

हे नियम सोपे झालेत

आता जन्म दाखल्याऐवजी ७ ते ८ दुसऱ्या कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने समावेश केलेली ही कागदपत्रे सहजतेने उपलब्ध होणारी आहेत. यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना किंवा यांसारख्या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्य कागदपत्रांवरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल. अनाथ. साधू-संन्यासी, आणि घटस्फोटीत महिलांसाठी नियम झाले सोपे-
अनाथालयातील मुलांसाठी तेथील प्रमुख जी जन्म तारीख देतील ती ग्राह्य धरली जाईल. साधू-संतांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडीलांऐवजी त्यांच्या गुरूंचं नाव ग्राह्य धरलं जाईल. याशिवाय घटस्फोटीत महिलांना त्यांच्या आधीच्या पतीचं नाव पासपोर्टसाठी अर्ज करताना विचारले जाणार नाही.

पासपोर्ट अॅप डाऊनलोड करा

गुगलच्या प्लेस्टोअरवरुन पासपोर्ट सेवा अॅप डाउनलोड करता येईल. या अॅपद्वारे पासपोर्टशी निगडीत सर्व कामं करता येतील. देशात सध्या एकूण ३०७ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. गेल्या ४ वर्षांमध्ये देशात पासपोर्ट क्रांती झाली. आम्ही गेल्या ४ वर्षांमध्ये एकूण २१२ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केली आहेत, असे स्वराज म्हणाल्या.