'चौकीदार चोर है' वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांची दिलगिरी

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. 

Updated: Apr 22, 2019, 01:03 PM IST
'चौकीदार चोर है' वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांची दिलगिरी  title=

नवी दिल्ली : राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'चौकीदार चोर है' अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायलयाने देखील म्हणत आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. यावरून ते वादात सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. आज या वक्तव्यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नव्हते असे स्पष्टीकरण राहुल यांनी दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करत राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली. निवडणुकीत दरम्यान बोलण्याच्या ओघात हे वक्तव्य निघाल्याचे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी उद्या निर्णय सुनावणार आहे. 

भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयासंदर्भात जे काही वक्तव्य केले आहे ते चुकीचे आहे असे 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने असे कोणतेही वक्तव्य केले नाही आणि न्यायालयासमोर असे वक्तव्य करण्यासारखा कोणता प्रसंगही नव्हता. कारण त्यावेळी कागदपत्रांच्या स्वीकार आर्हतेवर निर्णय घ्यायचा होता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायलयाने यासंदर्भात राहुल यांना 22 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि 23 एप्रिलला सुनावणी होईल असेही म्हटले होते. 

मी सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद देतो. पूर्ण देश म्हणतोय चौकीदार चोर आहे. (चौकीदाराने चोरी केली आहे). सर्वोच्च न्यायालयानेही हे म्हटले आहे. असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.