Pulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला

Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते. 

Updated: Feb 14, 2023, 08:37 AM IST
Pulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला title=
remembering Pulwama Attack sad memories crpf balakot air strike

Pulwama Attack: आतापर्यंत भारतावर जेव्हाजेव्हा दहशतवाद्यांनी वक्रदृष्टी टाकली तेव्हातेव्हा त्यांचा नायनाट करत भारतीय लष्करानं (Indian Army) त्यांना सळो की पळो करून सोडलं. चार वर्षांपूर्वीसुद्धा अशीच एक हादरवणारी घटना घडली आणि संपूर्ण देश हळहळला. पण, या हल्ल्याचा सूड घेताना मात्र लष्करानं मागेपुढं पाहिलं नाही. 

पुलवामा हल्ला आणि त्या कटू आठवणी... 

आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ला (Jammu Kasmir) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 CRPF जवानांचा प्राण गमवावे लागले होते. जम्मू श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरून सीआरपीएफ जवान असणाऱ्या बसचा ताफा पुढे जात होता. हा ताफा ज्यावेळी पुलवामा इथं पोहोचला तेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं आलेल्या एका कारनं बसला धडक दिली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं होतं. ज्यामुळं तिथं मोठा स्फोट झाला. यामध्ये तब्बल 40 जवांन शहीद झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देश हळहळला होता. 

हेसुद्धा वाचा : Holidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत आजच्या दिवशी देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. त्यांनी देशासाठी केलेला त्याग कधीही विसरता येणार नाही असं म्हणत हे धैर्य एका सक्षम आणि प्रगत राष्ट्राच्या बांधणीसाठी मदत करतं असंही ते म्हणाले. 

...आणि भारतीय लष्करानं या हल्ल्याचं जशास तसं उत्तर दिलं 

पुलवामा येथे झालेल्या या दहशतवादी (Terrorist Attack) हल्ल्यानंतर यंत्रणांपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वजण सतर्क झाले. या हल्ल्यानंतर शांत न राहता सडेतोड उत्तर देण्याचं ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगानं पावलंही उचलण्यास सुरुवात झाली. हल्ल्यानंतर काही दिवसांनी भारतीय वायुदलानं बालाकोट एअर स्ट्राईक (Balakot Air Strike ) करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे दहशतवादी तळ उध्वस्त केले. दुसऱ्याच दिवशी सीमेलगत (India vs Pakistan) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या वायुदलांमध्ये सौम्य टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये भारतीय वायुदलाचं मिग 21 पाकिस्तानच्या हद्दीत अपघातग्रस्त झालं आणि यातच वायुदलाच्या अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. इथं सीमाभागातही पाकच्या सैन्याकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं. पण, यातही भारतीय सैन्य मागे हटलं नाही.