पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा

Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 11, 2024, 09:53 AM IST
पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा title=
एका अहवालात करण्यात आला खुलासा

Russia Ukraine War Modi Nuclear War: रशिया आणि युक्रेनदरम्यानचं युद्धाला दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही सुरुच आहे. मात्र या युद्धासंदर्भातील धक्कादायक खुलासा नुकताच झाला आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रम केल्यानंतर त्याच वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये रशिया युक्रेनवर अणूबॉम्ब टाकणार होता. युक्रेनवर अण्विक हल्ला करण्याचा रशियाचा विचार होता. मात्र हे रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर अन्य देशांच्या प्रमुख नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नक्की काय घडलं?

'सीएनएन'ने एका रिपोर्टमध्ये 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, सन 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही नेत्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर चर्चा करुन युक्रेनवर होणारा संभाव्य अण्विक हल्ला थांबवला होता. या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील बायडन यांच्या प्रशासनाला रशिया युक्रेनविरुद्धचं युद्ध कायमचं संपवण्यासाठी अण्विक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शंका होती. यासंदर्भात अमेरिकेने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर रशियाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांच्या मंत्र्यांशी चर्चा करुन रशियाला आपला संदेश दिला. युक्रेनवर अण्विक हल्ला झाला परिस्थिती चिघळेल असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. मोदी आणि इतर मंत्र्यांनी रशियाला युक्रेनवर अण्विक हल्ला करण्यापासून परावृत्त केल्याने मोठं संकट टळलं. 

अमेरिकेने केली विनंती

रशिया युक्रेनवर हल्ला करु शकतो अशी माहिती डिसेंबर 2022 च्या आसपास अमेरिकेला मिळाली. युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या खेरसनमध्ये रशियाचा ताबा असलेला प्रांत युक्रेनच्या लष्कराने परत मिळवला होता. त्यावेळेस त्यांनी रशियन लष्कराला चारही बाजुंनी घेरलं होतं. खेरसनमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये अण्विक युद्ध होऊ शकतं अशी भिती अमेरिकेला होती. यानंतर अमेरिकेने भारताबरोबरच अन्य दाक्षिणात्य देशांच्या मदतीने ही परिस्थिती ओढवू नये म्हणून प्रशासकीय पातळीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. अमेरिकेने केलेल्या विनंती नंतर भारत आणि चीनबरोबर अन्य प्रभावशाली देशांनी रशियाशी चर्चा सुरु केली आणि असा कोणताही प्रकार होणार नाही यासंदर्भातील काळजी घेत चर्चेतून ही परिस्थिती निवळण्यास मदत केल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या चर्चेमुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलण्यापासून रोखण्यात यश आलं. 

भारताने अनेकदा उघडपणे घेतली भूमिका

रशिया युक्रेन युद्धामधील मानवी संहाराविरोधात भारताने अनेकदा उघडपणे आपली बाजू मांडत अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरही या युद्धा विरोध केला आहे. युद्धाऐवजी शांततापूर्ण मार्गाने या वादावर तोडगा काढला पाहिजे असं भारताने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी उज्बेकिस्तानमधील एससीओ शिखर परिषधेमध्ये पुतीन यांना हा काळ युद्धाचा नाही असा सामंजस्याचा सल्ला दिला होता. भारताने युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्याही यापूर्वी चर्चेत होत्या. भारताने या युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच निष्पक्ष राहिला असून अनेकदा भारताने या विषयावरुन एका बाजूने मतदान करणं टाळलं आहे.