Snake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना

एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

Updated: Jun 22, 2023, 09:29 PM IST
Snake Bite :  एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना title=

Snake Bite :  एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सापाने चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व लोकांना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पण या घटनेने सर्वच हैराण झाले आहेत. राजस्थानमधल्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यातील ही घटना आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तींना विषबाधा (Poisoning) झाली असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

काय आहे नेमकी घटना
बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाचं पाणी बिळात शिरल्याने साप बिळाच्या बाहेर आले. यावेळी काही जणं शेतात काम करत होते, तर काही जणं घरात होती, काही जण बाहेर कामानिमित्त गेली होती. यातील अनेक जणांना सर्पदंश झाला. सर्पदंश झालेली लोकं बाडमेर जिल्ह्यातील धारासर, चाडार, नवातला जेतमाल, खारिया राठोडान, गंगाला, उपरला, सनाऊ, कापराऊ, सादुल या गावातील आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थानमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे विषारी साप आणि जीव जंतू आपल्या बिळातून बाहेर आले. त्यामुळे एकाच रात्रीत जवळपास 19 लोकांना सर्पदंश झाल्याची घटना घडली. एकाचवेळी सर्पदंशामुळे इतके लोकं रुग्णालयात दाखल होण्याची ही पहिलीच वेल असल्याचं चौहटन रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर अशोक पंवार यांनी सांगितलं. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

राजस्थानमध्ये पूर परिस्थिती
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जालोर जिल्ह्यातील सांचोर इथलं धरण फुटल्याने अनेक भाग पाण्याखाली गेला होता. 
बाडमेर आणि सिरोहीमध्ये मुसळधार पावसामुळे शहरांमध्ये नद्यांसारखे पाणी वाहत होती. जिल्ह्यांतील काही भागात आतापर्यंत 10 ते 13 इंच पावसाची नोंद झाली. शहरात अचानक पाणी आल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा लोकांनी बाजारपेठेतील दुकाने रिकामी केली. त्याचबरोबर सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं.

मुसळधार पावसामुळे बाडमेर, जालोर, पाली, आणि सिरोही या चार जिल्ह्यात पूरपरिस्तिती निर्माण झाली होती. या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या चार आणि एसडीआरएफच्या 30 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. तर कच्च्या घरांचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली. पुरामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती आहे.