मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...

Vande Bharat Train : वंदे भारतला मालगाडीनं का खेचावं लागलं? नेमकं झालं तरी काय? व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सोशल मीडियावर चर्चांना उधाण   

सायली पाटील | Updated: Sep 10, 2024, 10:37 AM IST
मालगाडीच्या इंजिनानं खेचली वंदे भारत; Video व्हायरल होताच Indian Railway ची सारवासारव, म्हणे...  title=
Vande Bharat Express pulled by goods train engine video viral

Vande Bharat Train : (Indian Railway) भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अनेक सुविधांची आखणी केली जात असतानाच काही बाबतीत मात्र रेल्वेला आजही असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. अशाच एका प्रसंगाला रेल्वे विभागानं तोंड दिलं. जिथं, 9 सप्टेंबरला सकाळी नवी दिल्लीहून बनारसच्या दिशेनं निघालेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं ही अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन इटावा येथील भरथना रेल्वे स्थानकापाशी थांबली. 

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासीसुद्धा बेचैन झाले आणि यामुळं इतरही अडचणींनी डोकं वर काढलं. अडचणी वाढत असतानाच अखेर मलागाडीमुळं या अत्याधुनिक रेल्वेला मदत मिळाली आणि मालगाडीनं खेचून आणचत ही वंदे भारत एक्स्प्रेस भरथना रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली. 

हा झाला प्रकार पाहताना प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रेल्वे प्रशासनानं शताब्दी आणि अयोध्येला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला थांबवत जवळपास 750 प्रवाशांची त्या माध्यमातून प्रवासाची सोय करुन देत त्यांना कानपूरला पोहोचवलं. यादरम्यान वंदे भारतला मालगाडी खेचून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. जे पाहून प्रवासी आणि नेटकऱ्यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला. 

हेसुद्धा वाचा : नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण... 

नवी दिल्लीहून बनारसच्या दिशेनं निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बिघाडामुळं हा गोंधळ डोकं वर काढताना दिसला. तंत्रज्ञांनी लगेचच तो सावरण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश मिळालं नाही. अखेर या रेल्वेतील प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली. पण, तंत्रज्ञांच्या अपयशाचं कारण पुढे करणाऱ्या रेल्वे प्रशानाच्या या कारणामुळं प्रवाशांचं समाधान मात्र झालं नाही. उलटपक्षी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर संतापच व्यक्त केला.