कल्याण-डोंबिवलीतून वगळलेल्या १८ गावांची होणार 'कल्याण उपनगर नगरपरिषद'

नगरविकास विभागाने केली प्रारूप अधिसूचना जारी

Updated: Jun 24, 2020, 10:23 PM IST
कल्याण-डोंबिवलीतून वगळलेल्या १८ गावांची होणार 'कल्याण उपनगर नगरपरिषद' title=

आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांपैकी १८ गावांची वेगळी नगर परिषद स्थापन होणार असून, कल्याण उपनगर नगरपरिषद असे नाव त्याला देण्यात आले आहे. नगरविकास विभागाने प्रारूप अधिसूचना जारी केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता, मात्र त्याची अधिसूचना जारी केली नव्हती. आज राज्य शासनाने वगळलेल्या १८ गावांसाठी कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करून त्याची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. 

१८ गावे कोणती?

घेसर, हेदुटणे, भाल, उंब्रोली, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडीवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे

महापालिका निवडणूक

दुसरीकडे केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने केडीएमसीला पत्र पाठवून प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक ठरल्या वेळप्रमाणे होते का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० ला संपत आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम हा एप्रिल अथवा मे २०२० या कालावधीत होणे आवश्यक होते. 

डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्याची अधिसुचना पालिकेला प्राप्त झालेली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी असल्याने १८ गावांच्या नगरपरिषदेच्या सरकारी निर्णयाला त्यांनी विरोध केला आहे.