भाजपा नेत्यांकडे आभास निर्माण करण्याची उत्तम कला- थोरात

बाळासाहेब थोरात हे सध्या राज्याच्या विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. 

Updated: Oct 10, 2019, 06:26 PM IST
भाजपा नेत्यांकडे आभास निर्माण करण्याची उत्तम कला- थोरात  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : भाजपा नेत्यांकडे आभास निर्माण करण्याची उत्तम कला असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात हे सध्या राज्याच्या विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा येथे काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात हे लामजना येथे आले होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना सरकार जोरदार टीका केली. 

राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका यावेळी थोरात यांनी केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील दौऱ्यावरही थोरात यांनी टीका केली. 

महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मिरच्या ३७० कलम चा मुद्दा काय कामाचा असा सवाल करीत जनतेच्या मुद्द्याला बगल देऊन आभास निर्माण करण्याची उत्तमकला  भाजपच्या नेत्यांकडे असल्याची जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद 

पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. यामागे भाजपच्या लोकांचे कट कारस्थान असल्याचा आरोप अर्ज बाद झालेले काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

निवडणूक अधिकाऱ्ंयासोबत संगनमत करून जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. या मतदारसंघात शिवेसेनेचे आमदार संजय शिरसाठ निवडणूक रिंगणात आहेत. मात्र भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे हे विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे निकटवर्तीय आहेत. म्हणून बागडेंनीच हा घात केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.