राज्यातील या ठिकाणचे बंड शमविण्यात यश, आता थेट लढत

 युतीच्या उमेद्वारांसमोर काही बंडखोरांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश 

Updated: Oct 7, 2019, 02:58 PM IST
राज्यातील या ठिकाणचे बंड शमविण्यात यश, आता थेट लढत title=

मुंबई : शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेद्वारांसमोर बंडखोरीची मोठे आव्हान उभे आहे. यातील काही बंडखोरांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश येताना दिसत आहे. मुंबईच्या गोवंडी-शिवाजीनगर मतदार संघातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे हे युतीचे उमेदवार आहेत. परंतु त्यांच्यासमोर आरपीआय आठवले गटाचेच मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याचा फटका युतीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणत या मतदार संघातून बसण्याची शक्यता होती. तर दोघांना उमेदवारी दिल्याने आणि आरपीआयवर अन्याय झाल्याने आरपीआयचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम नाराजी व्यक्त केली होती. सोनवणे यांना युतीच्या नेत्यांनी समजवल्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे .आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी रामदास आठवले यांच्या आदेशावरून आम्ही युतीच्या उमेदवारांना मदत करणार आहोत अशी प्रतिक्रीया त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सोनवणे यांनी दिली.

आमदार भोईर यांची नाराजी दूर

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात अखेर विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची नाराजी दूर करण्यामध्ये शिवसेनेला यश आला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून आधी सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. नंतर केडीएमसी चे शिवसेना चे नगरसेवक यांना पक्षाने उमेदवारी दिली  शेवटचा क्षणी उमेदवार बदल केल्याने  सुभाष भोईर हे नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र पक्षाच्या मेळाव्यात ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विद्यमान आमदार सुभाष भोईर हे मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांनी पक्षाचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

विक्रमगड : भाजपविरोधातील बंड थंड

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधातील बंड थंड झाले आहे. भाजपमधील सुरेखा थेतले, हरिश्चंद्र भोये आणि मधुकर खुताडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या उमेदवारी वरून भाजपमधील सुरेखा थेतले, हरिश्चंद्र भोये आणि मधुकर खुताडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली होती.शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे सदर बंडखोरांचा बंड संपला असून आता विक्रगड मतदार संघात महायुती व महाआघाडी यामध्ये खरी चुरस रंगणार आहे.महाआघाडी कडून राष्ट्रवादीचे सुनील भुसारा उमेदवार आहेत.

रत्नागिरीत बंड शमले

 रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे बंड शमले आहे. रत्नागिरीत पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. येथे भाजपला एकही जागा न दिल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी करत युतीच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारले होते. मात्र, चारही बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे येथे शिवसेनेच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. चारही मतदारसंघातुन भाजपच्या अपक्ष उमेदवारांची माघार घेतली. यात
दापोलीतून केदार साठे, चिपळूणमधून तुषार खेतले, गुहागरमधून रामदास राणे, राजापूरमधून संतोष गांगण यांनी माघार घेतली आहे. पक्षाचा आदेश मानून हा निर्णय घेण्यात आला आहे. तो सर्व उमेदवारांनी मानला. आता आम्ही महायुतीचे काम करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.

नाशकात कोथरुड पॅटर्न, येथ छुपी युती

नाशिकमध्ये तासातासाला मोठ्या राजकिय घडामोडी होत आहे. मनसेकडून आघाडीला छुपा पाठिंबा असल्याचं देखील उघड होत आहे. नाशिक मध्येही आता कोथरूड पॅटर्न पाहायला मिळत आहे. नाशिक पश्चिममधून शिवसेनेच्या तीन बंडखोरांपैकी मामा ठाकरे यांनी माघार घेतलीय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मनधरनीला यश आलंय. उर्वरित दोघे सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांचीही मनधरणी केली जाईल, असा विश्वास भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला. 

मात्र, बडगुजर आणि शिंदे हे दोघेही नॉटरीचेबल असल्यानं बंड कायम आहे. दुसरीकडे नाशिक पूर्वमधील मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. तर भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मुर्तडक यांनी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही आघाडी आणि मनसेची छुपी युती असल्याचं उघड झालेय.

काँग्रेससाठी मोठा दिलासा

नांदेडमध्ये काँग्रेसचे बंडखोर विनय गिरडे पाटिल यांची माघार घेली आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर विनय गिरडे यांनी बंडखोरी करत नांदेड दक्षिणमधुन अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव हंबर्डे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नांदगाव मतदार संघ

नांदगाव मतदार संघातून शिवसेनेचे बंडखोर नेते यांनी माघार घेतली आहे. शिवसेना गटनेता गणेश धात्रक यांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मोठे यश आले आहे. तर हिंगोलीतन माजी आमदार गजानन घुगे आणि माजी खासदार शिवाजी माने यांनीही माघार घेतली आहे. कळमनुरी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही उमेदवारांनी भाजपकडून बंडखोरी केली होती. त्यामुळे येथून शिवसेना उमेदवार संतोष बांगर यांचा रस्ता मोकळा झाला आहे.