राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात

राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत.

Updated: Mar 11, 2018, 11:15 PM IST
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपचे हे ३ उमेदवार रिंगणात title=

मुंबई : राज्यसभेसाठी भाजपचीही तीन नावं निश्चित झाली आहेत. प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.मुरलीधरन या तिघांना भाजपनं संधी दिली आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपच्या कोट्यातून तीन खासदार जाणार आहेत. २३ मार्चला राज्यसभेची निवडणूक होणार आहे.

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. जावडेकर हे सध्या मध्य प्रदेशमधून भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कालावधी २ एप्रिलला पूर्ण होत आहे, त्यामुळे त्यांना यंदा महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.

नारायण राणे

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंचीही राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यावर राणेंनी महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची स्थापना केली होती. राणेंच्या पक्षानं एनडीएला पाठिंबा जाहीर केला होता. राज्यामध्ये मंत्रीपदासाठी नारायण राणेंनी प्रयत्न केले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी राणेंना राज्यसभेची उमेदवारी दिली. नारायण राणेंनी ही ऑफर स्वीकारली.

व्ही. मुरलीधरन

भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधरन हे केरळ भाजपचे अध्यक्ष आहेत.

कोण आहेत मुरलीधरन?

- मुरलीधरन सध्या केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत.

- २०१० आणि २०१३ मध्ये केरळ प्रदेशाध्यक्ष बनले.

- मुरलीधरन यांनी डाव्यांचा गड केरळमध्ये पावणे सहा लाख सदस्यावरून २० लाख भाजप सदस्य बनवले.

- २००९ मध्ये ६.४ टक्के मतदारांनी भाजपला मत दिले तर २०१४ मध्ये १०.८ टक्के मतदारांनी भाजपला मत दिले.

- ५९ वर्षीय मुरलीधरन यांनी यापूर्वी पक्षातील विविध पदावर काम केले

- १२ डिसेंबर १९५८ रोजी थलासरी येथे जन्म झाला.

- इंग्लिश लिटरेचर मध्ये पदवी घेतली आहे

- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले

- १९७५ ते १९७७ दरम्यान आणीबाणीत कारावास भोगला

- १९७८ मध्ये एबीव्हीपी तालुका अध्यक्ष

- १९८० मध्ये एबीव्हीपी राज्य सरचिटणीस बनले

- डाव्यांचा गड असलेल्या कुन्नूर येथे मुरलीधरन यांनी लिपिक म्हणून काम केले

- १९८३ मध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ संघाचे काम सुरू केले

- मुंबईत १९९४ ते १९९६ दरम्यान एबीव्हीपीचे अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून काम केले.

- १९९८ च्या लोकसभा निवडणूकीत दिल्लीतील भाजप निवडणूक नियंत्रण कक्षाचे काम पाहिले

- वाजपेयी सरकार असताना नेहरू युवा केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली

- मुंबईतच मुरलीधरन यांना राष्ट्रीयस्तरावर ओळख मिळाली

काँग्रेसकडून कुमार केतकर

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे. कुमार केतकर हे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि दिव्य मराठी या वृत्तपत्रांचे संपादक होते. कुमार केतकर यांना पत्रकारितेचा प्रदिर्घ अनुभव आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध?

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं आहेत. सहा जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. भाजपनं याआधीच तीन नावांची घोषणा केली आहे. तर काँग्रेसनंही एक उमेदवार घोषित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही प्रत्येकी एक उमेदवार असण्याची शक्यता आहे.