बैलगाडा शौकिनांची 'ती' शर्यत ठरली अखेरची, असं काय झालं की गावावर पसरली शोककळा!

Amravati News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडाला आहे. मात्र अमरावतीमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये घडेल्याने प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे

Updated: Jan 17, 2023, 01:38 PM IST
बैलगाडा शौकिनांची 'ती' शर्यत ठरली अखेरची, असं काय झालं की गावावर पसरली शोककळा! title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : बैलगाडा शर्यतीबाबत (bullock cart race) गेल्या वर्षी आलेल्या निकालानंतर राज्यात शर्यतींचा धुराळा उडाला आहे. राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र अमरावतीमध्ये (Amravati News) बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या चौघांना जीव गमवावा लागला आहे. बैलगाडा शर्यत पाहून घरी परतत असताता झालेल्या दोन विविध अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून शंकर पट (बैलगाडा शर्यत) सुरू आहे. पट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येत आहेत. मात्र सोमवारी शंकर पट पाहून घराकडे परताताना रात्री उशिरा तळेगाव परिसरात झालेल्या दोन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शंकरपट पाहून घराकडे परतणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. 

दुसऱ्या एका घटनेत यवतमाळहून धामणगावकडे जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे व कारचालक असे तिघेजण जागीच ठार झाले. या भीषण अपघातांमुळे अमरावतीमध्ये शोककळा पसरली आहे. दोन्ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या दोन्ही अपघातांचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा करत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही शंकरपटाची धूम

दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शंकरपटाची धूम पाहायला मिळत आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडीत पारंपारीक बैलजोडी शर्यंतीमुळे शंकरपट पाहण्याची पर्वणी लोकांना मिळत आहे.  बैलजोडीने धावणाऱ्या शर्यतीला शंकरपट संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका शंकरपटाकरिता प्रसिद्ध आहे. बंदी उठल्यावर तब्बल 11 वर्षांनंतर पटप्रेमी व शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला आहे. त्यामुळे बैलजोडी शर्यतीचा आनंद हजारो नागरिकांना लूटायला मिळत आहे.