Gautami Patil : कापसाला पाणी बकेटने मारतील पण... डान्सचे ठुमके कमी करा म्हणत शेतकऱ्याचे गौतमी पाटीलला पत्र

Gautami Patil : श्रीकांत गडळे नावाच्या शेतकरी पुत्राने हे पत्र लिहीलं असून ते फेसबुकवर पोस्ट केले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ते गौतमी पाटीलपर्यंत पोहोचण्याची विनंती श्रीकांतने केली आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 17, 2023, 02:02 PM IST
Gautami Patil : कापसाला पाणी बकेटने मारतील पण... डान्सचे ठुमके कमी करा म्हणत शेतकऱ्याचे गौतमी पाटीलला पत्र title=

Gautami Patil Viral Letter : लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या जोरदार चर्चेत आहे. तिच्या नृत्यावरुन (Gautami Patil Dance) सातत्याने टीका होत असली तरी महाराष्ट्रभर गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तिच्या नृत्याचे कार्यक्रम पार पडत आहेत. अशातच गौतमी पाटीलने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबाबत भाष्य केले होते. यावरुन विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच एका शेतकरी मुलाने गौतमी पाटीलला पत्र लिहीत राज्यातील सगळ्याच परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलने तिच्या लग्नाविषयी भाष्य केले होते. यावर बोलताना घरातल्या जबाबदाऱ्यांचा निदान अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असावा अशी इच्छा आहे. म्हणून मला लग्न करायचंय आहे, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली होती. त्यावर आता एका शेतकरी पुत्राने गौतमी पाटीलला पत्र लिहीत मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे म्हटलं आहे.

काय म्हटंलय पत्रात?

बीडच्या श्रीकांत गडळे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. ''गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही. आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली कि मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही. गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण.. लग्नाला कोणीच तयार नाही.  तुमचे ठुमके वर लाखो फिदा, पण लग्नाला कुणीच तयार नाही, जरा आत्मपरीक्षण करा,'' अशा शब्दात श्रीकांत याने कानउघडणी केली आहे.

"या महाराष्ट्रात चटक मटक भाजी एक दिवस गोड लागते, पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेचाच लागतो. हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा. खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही," असेही श्रीकांत गडळे याने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

"किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतो … इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा," असा सल्ला श्रीकांतणे दिला आहे.

दरम्यान, या पत्राच्या शेवटी श्रीकांत गडळे याने हे पत्र इतके शेअर करा की गौतमी पाटील पर्यंत पोहचेल असे म्हटले आहे.