आईनंच घेतला पोटच्या लेकरांचा बळी, रायगड जिल्हा हादरला

डोक्यात राग गेला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये समोर आलंय.

Updated: May 31, 2022, 11:52 PM IST
आईनंच घेतला पोटच्या लेकरांचा बळी,  रायगड जिल्हा हादरला title=
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड : डोक्यात राग गेला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं एक धक्कादायक उदाहरण रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये समोर आलंय. संतापाच्या भरात इथं एका मातेनं पोटच्या सहा लेकरांनाच विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतलाय. (in raigad mahad mother attempted suicide by pushing 6 children into a well)

दृश्यात दिसणारी हीच ती नराधम माता रूना चिखुरी साहनी. जिनं आई या शब्दालाच काळीमा फासलाय. साहनी कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातल्या गोखपूर जिल्ह्यातलं. पोटापाण्यासाठी ते महाड एमआयडीसीत वास्तव्यास आलं. त्यांच्या पदरी 5 मुली आणि एक मुलगा. 

दोन दिवसांपूर्वी रूनाचं नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण झालं. याच रागातून तिनं घर सोडलं. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास तिनं ढालकाठी इथं आपल्या चिमुकल्यांना विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर स्वत:ही जीव देण्याचा प्रयत्न केला. तिथून जाणाऱ्या आदिवासींनी तिला वाचवलं. मात्र या दुदैवी घटनेत सहा मुलांचा करूण अंत झाला. 

या घटनेनं संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेलाय. चिमुकल्या जिवांचा बळी घेणा-या निर्दयी मातेला पोलिसांनी अटक केलीय. पती दारू पिऊन मारझोड करायचा, चारित्र्यावरून संशय घ्यायचा असा जबाब तिनं दिलाय. 

मात्र यासाठी तिनं इतकं मोठं टोकाचं पाऊल का उचललं ? या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाही. 

प्रत्येकाला विचार करायला लावणारी अशीच ही घटना आहे. क्षुल्लक कारणावरून एक आई पोटच्या लेकरांना विहिरीत ढकलून देते. याचा तिला जराही पश्चाताप नाही. ही घटना पाहिल्यानंतर माणूस आणि जनावरातला फरक काय ? हाच प्रश्न पडतो.