जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी'

धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी घटनेला फोडली वाचा

Updated: Jan 3, 2019, 01:24 PM IST
जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून लंडनशिक्षित वराकडून वधुची 'कौमार्य चाचणी' title=

पुणे : कंजार भाट समाजात वधूची कौमार्य चाचणी (virginity test) करण्याची कुप्रथा अजुनही सुरूच असल्याचं समोर येतंय. समाजातील तरुण पिढीनं 'स्टॉप द व्ही रिच्युअल्स' मोहिमेद्वारे या पद्धतीच्या विरोधात आवाज उठवलाय. मात्र, असं असताना काहींना मात्र जातपंचायतीच्या जाचाला अजूनही शरण यावं लागतं. त्याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचं लग्न एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीशी गेल्या आठवड्यात झालं. विशेष म्हणजे वधू आणि वर दोघेही उच्चशिक्षित आहेत... इतकंच नाही तर नवऱ्या मुलानं लंडनहून आपलं शिक्षण पूर्ण केलंय... असं असताना त्यांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर समाजाची जात पंचायत भरली. या जातपंचायतीत मुलाला मुलीच्या कौमार्याविषयी पंचाकडून विचारणा करण्यात आली. त्यावर मुलानं 'समाधान, समाधान, समाधान' असं उत्तर दिलं... 

अधिक वाचा :- कंजारभाट समाजातील तरुणांचा 'व्हर्जिनिटी टेस्ट'विरुद्ध एल्गार!

याचा अर्थ जात पंचायतीला कायद्यानं बंदी असताना अशा जातपंचायती अजूनही अस्तित्वात आहेत. त्याचा कारभार छुप्या पद्धतीनं सुरु आहे. असं असलं तरी समाजातील तरूण पिढी या अनिष्ठ रुढींना धाडसानं विरोध करत आहे. त्यापैकीच एक असलेले धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी या प्रकाराला वाचा फोडलीय.

अधिक वाचा :- लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला

कृष्णा इंद्रेकर हे स्वत: या विवाहासाठी उपस्थित होते... उघडपणे या कुटुंबानं कौमार्य चाचणी (virginity test) करणार नसल्याचं सांगितलं. परंतु, जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून त्यांनी ही कौमार्य चाचणी केलीच, असं इंद्रेकर यांनी म्हटलंय. या प्रकरणाची पोलिसांत रितसर तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा :- जात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!

व्हर्जिनिटी टेस्ट किंवा कौमार्य चाचणी

कंजारभाट समाजात लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी (virginity test)  करण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याच्या अनेक घटना उघड झाल्यात. या कुप्रथेतून महिलांचं शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या रात्री तरुण-तरुणीच्या शरीरसंबंधामध्ये पांढऱ्या कपड्यावर रक्ताचा डाग न पडल्यास तरुणी या टेस्टमध्ये 'नापास' ठरते. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला पंचांसमोर कपडे उतरवणं, शरीराच्या नाजूक भागांना चटके देणं, उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढणं असे अनेक पद्धतीचे अमानवीय दंड दिले जातात. 

अधिक वाचा :- जात पंचायतीच्या 'व्हर्जनिटी टेस्ट'ला धुडकावून लग्न