OBC RESERVATION प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत येण्याची गरज काय?, जयंत पाटील यांचा फडणवीस यांना सवाल

'माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन' - देवेंद्र फडणवीस

Updated: Jun 28, 2021, 01:37 PM IST
OBC RESERVATION प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत येण्याची गरज काय?, जयंत पाटील यांचा फडणवीस यांना सवाल title=

नांदेड : ' ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा आम्ही प्रश्न सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही, जनतेने तुम्हाला नाकारले आहे असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नांदेडमध्ये आयोजित पात्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. सत्तेत आल्याशिवाय काहीच करायचं नाही का? असा सवालही जयंत पाटील यांनी फडणवीसांना विचारला आहे.

संजय राऊत यांचाही फडणवीसांना टोला

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं होतं?

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. नागपूरमधल्या आंदोलनात बोलतान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.