तर जलसंपदा विभागच बंद करा, मंत्रीमंडळ बैठकीत जंयत पाटील संतापले

जलसंपदा विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे पाठवली

Updated: May 12, 2021, 08:56 PM IST
तर जलसंपदा विभागच बंद करा, मंत्रीमंडळ बैठकीत जंयत पाटील संतापले title=

दिपक भातुसे, झी 24 तास मुंबई : आज म्हणजेच 12 मे ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले. मंत्रीमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे मिनिट्स मंजूर करण्यात आले होते, असे असताना ती फाईल वित्त विभागाकडे पाठवल्याने जयंत पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिवांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाच्या कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे पाठवली, त्यांनी असे का केले? हा प्रश्न  जयंत पाटील यांना पडला आहे. यासाठी त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्याच बरोबर मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या गोष्टी अशा अचानक बदलंत असतील तर, मंत्रीमंडळाच्या वर कोण आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

यासगळ्या प्रकारानंतर जलसंपदा विभागाच बंद करून टाका, असे संतप्त विधानही जयंत पाटील यांनी केले आहे. या आधीही मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय मुख्य सचिवांनी बदलला असल्याने जयंत पाटील जास्त नाराज झाले आहेत.