'पबजी' विरोधात महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या मुलाचे सरकारला पत्र

लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून...

Updated: Jan 31, 2019, 01:08 PM IST
'पबजी' विरोधात महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या मुलाचे सरकारला पत्र    title=

नवी दिल्ली : 'पोकेमॉन', 'ब्लूव्हेल' या गेमनंतर 'पबजी' गेम खेळण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होते आहे. तरुण वर्गाला 'पबजी' गेमचे वेड लागल्याचे दिसते आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका मुलाने पबजी हा गेम तरुणांसाठी घातक असल्याचे सरकारला पत्र लिहले आहे. महत्वाचे म्हणजे, त्याचे नाव अहाद असून, तो केवळ ११ वर्षांचा आहे. पबजी गेममुळे लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून पबजी गेमवर बंदी घाला, असेही त्याने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात अहादने, ४ पानांचे पत्र लिहून सरकारला पाठवले. या पत्रात त्याने पबजी गेमवर बंदी घाला, अशी मागणी सरकारकडे केली. कारण, हा गेम हिंसा, सायबर गुन्हेगारी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणारा ठरु शकते. सरकारने हा विषय गंभीरपणे न घेतल्यास याचे भयंकर परिणाम आपणास दिसू लागतील. पबजी हा गेम केवळ खेळण्यासाठी मर्यादित नसून, यात बऱ्याच नकारात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चोरी करणे, खून करणे यावर संपूर्ण गेम अवलंबून आहे, असे त्याने पत्रात लिहिले आहे.

हे पत्र केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण ७ जणांना पाठवण्यात आले आहे. अद्याप, अहादला कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि त्यानी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गेम पबजी कॉर्पोरेशन, ब्लूहोल द्वारे विकसित करण्यात आला आहे.