Loksabha : शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक? कसंय धुळ्याचं राजकीय गणित?

Dhule Loksabha : धुळे मतदारसंघातून भाजपनं तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरेंना संधी दिलीय. तर काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना मैदानात उतरवलंय. काय आहे धुळ्याचं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट 

सौरभ तळेकर | Updated: Apr 16, 2024, 11:01 PM IST
Loksabha : शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक? कसंय धुळ्याचं राजकीय गणित?  title=
Dhule Loksabha Election 2024, Subhash Bhamre, Shobha Bachhao

Dhule Loksabha Election 2024 : धुळे... खान्देशातलं महत्त्वाचं शहर... तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा हा भाग कापसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. कापूस, कांदा ही इथलं प्रमुख पिकं... राष्ट्रीय महामार्गांचं जाळं देखील धुळ्यात आहे. यंत्रमाग उद्योग ही धुळ्याची ओळख. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी विकासाची गंगा इथं पोहचू शकलेली नाही. धार्मिक आणि जातीय धुव्रीकरणामुळं विकासात धुळे मागे पडलं. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरचे स्वप्न अधुरेच आहे. एमआयडीसीमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. इंदूर रेल्वेमार्ग रखडलेलाच आहे. बेरोजगारी हे देखील धुळेकरांचं मोठं दुखणं आहे. धुळे हा मतदारसंघ अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनलाय. त्यानंतर धुळ्याचं राजकीय गणित बदललंय.

धुळ्याचं राजकीय गणित

2009 मध्ये भाजपच्या प्रताप सोनावणेंनी काँग्रेसच्या अमरीशभाई पटेलांचा पराभव केला. 2014 मध्ये भाजपनं डॉ. सुभाष भामरेंना उमेदवारी दिली. त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अमरीशभाईंना हरवलं. 2019 मध्ये काँग्रेसनं कुणाल पाटलांना संधी दिली. मात्र भामरेंनी त्यांचा पाडाव करून दुस-यांदा खासदारकी मिळवली. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, एमआयएमचे 2, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार आहे. भाजपनं यंदा तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरेंना मैदानात (Subhash Bhamre vs Shobha Bachhao) उतरवलंय. त्यांच्या उमेदवारीवर जनता काहीशी नाराज असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडं काँग्रेसनं माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलीय. मात्र त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षातूनच विरोध होतोय.

वंचित बहुजन आघाडीने आय पी एस अधिकारी राहिलेल्या अब्दूर रेहमान यांना तिकीट दिलंय. वंचितमुळं काँग्रेसची हक्काची वोट बँक विभाजनाच्या वळणावर आहे. भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि जिल्हास्तरीय नेते यांच्यात नीट समन्वय होऊ शकला नाही. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी कॉंग्रेसने अखेर डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. त्यांच्या उमेदवारीमुळे मालेगाव - धुळे विभागात नाराजी नाट्य सुरु झाल्याचं पहायला मिळतंय. नाशिक आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि श्‍याम सनेर यांनी राजीनामे दिले आहेत. तर माजी आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकारातून परिवर्तन मंचतर्फे धुळे लोकसभेसाठी सर्वसमावेशक तिसऱ्या पर्यायासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे.