शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी

शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.

राजीव कासले | Updated: Jul 1, 2023, 02:27 PM IST
शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी title=

Accident Day : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarga) आत्तापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात (Accident) झालाय. ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 5 जणांवर उपचार सुरू आहेत.  नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सची बस (Vidarbha Travel) लोखंडी पोलला धडकली आणि आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवासी जागेवरच होरपळले. बसमधील प्रवासी हे नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातले आहेत.  14 प्रवासी वर्ध्यातून बसले होते...

अपघात टायर फुटून नाही तर...
समृद्धीवरील अपघाताचा अमरावती RTO ने अहवाल सादर केलाय. या अहवालात टायर फुटून अपघात झाला नसल्याचं म्हटलंय. बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. त्यामुळे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडर आदळली. यामुळे वेगात असलेल्या बसच्या डिझेलची टाकी फुटून पेट घेतल्याचं अहवालात म्हटलंय...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) बुलढाण्यातील अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. तसंच रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीचीही विचारपूस केली. समृद्धीवर होणारे अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलाय. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल असंही ते म्हणालेत.

अपघातावरुन राजकारण
समृद्धी महामार्गावरील अपघातावरून आता राजकारण पेटलंय. हा भ्रष्टाचारामुळे शापित महामार्ग असल्याची टीका संजय राऊतांनी केली. तर बाळासाहेबांचं नाव दिलेल्या महामार्गाला शापित म्हणणं हा बाळासाहेबांचाच अपमान आहे असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणेंनी दिलं. हा अपघात नव्हे तर प्रवाशांची हत्या आहे असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. तर महामार्गाची बांधणी सदोष नाही असं उपमुख्यमंत्री म्हणालेत. 

पीडितांच्या कुटुंबियांना मदत
समृद्धी महामार्ग अपघातात मृत्यू झालेल्यांच् या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाख तर पंतप्रधानांकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीये.. तसंच जखमींवरही सरकारच्या खर्चात उपचार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केलीये. 

नागपूरमध्ये स्कूलबस उलटली
नागपूर जिल्ह्य़ात बडेगाव इथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली. या बसमध्ये 8 विद्यार्थी होते. अपघातामुळे काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागलाय. उपचारासाठी त्याला नागपुरात नेण्यात आलंय. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही बस उलटल्याची माहिती आहे. 

अकोल्यात बसला अपघात
अकोला जिल्ह्यातील अकोट इथे पिवळद फाटा इथे बसचा अपघात झालाय. या अपघातात 26 प्रवासी जखमी झालेत. अकोट इथून पुण्याला ही बस चालली होती. अपघातातल्या काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. सर्व जखमींवर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

कार आणि क्रुझरची धडक
नाशिकच्या वणी-सापुतारा महामार्गावर भीषण अपघात झालाय. खोरी फाट्याजवळ कार आणि क्रूझर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत तीन जण जागीच ठार झालेत. तर 10 जण जखमी झालेत. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनं चक्काचुर झालेत. 

पालघरमध्ये सख्ख्या भावंडांचा मृत्यू
पालघर जिह्यातील डहाणू जवळील मोडगाव येथे अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव पिकअपने रस्त्याने चालत असलेल्या दोघांना चिरडलं आहे. उधवा -मोडगाव - धुंदलवाडी रस्त्यावर हा अपघात घडला आहे. प्रीती मालकरी(11) आणि शाहिद मालकरी (8) अशी या मृत भावंडांची नावे आहेत. अपघातानंतर पिक अप चालक पिकअप घेऊन फरार झाला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. तर दोन्ही मृतदेह ना कसा उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेण्यात आले आहे.